नवी दिल्ली - आंध्र प्रदेशसाठी केंद्राकडून अपुरा निधी मिळाल्यासंदर्भात तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांनी पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ""केंद्र सरकारच्या अशा वर्तणुकीमुळे आंध्र प्रदेशच्या जनतेस आपण या देशाचा भाग नाही, असे वाटत आहे,'' असा इशारावजा विधान नायडू यांनी या पार्श्वभूमीवर केले आहे.
सध्या दुबईमध्ये असलेल्या नायडू यांनी टीडीपीच्या खासदारांची आणीबाणीची बैठक बोलावली होती. यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामधील दोन मंत्र्यांचाही समावेश होता. टीडीपीची पुढील भूमिका ठरविण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीदरम्यान पुढील भूमिका ठरेपर्यंत टीडीपी खासदारांनी संसदेमध्ये निषेध व्यक्त करणे सुरुच ठेवावे, अशी सूचना नायडूंनी दिली.
भाजप व टीडीपीमधील संबंध या पार्श्वभूमीवर तणावग्रस्त बनले आहेत.
|