जम्मू - काश्मिरी पंडितांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये परतण्याची हीच योग्य वेळ आहे. काश्मिरी पंडितांनी येथे परत येऊन त्यांचे अधिकार मिळवावेत, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज येथे केले.
पत्रकार परिषदेत बोलताना ठाकूर म्हणाले की, काश्मिरी पंडितांनी काश्मीरमध्ये परत यावे. त्यासाठी हीच योग वेळ आहे. काश्मिरी पंडितांना आयुष्यात सारे काही गमावावे लागले आहे. त्यांच्यावर अशी वेळ यायला नको होती. येथून निर्वासित झालेल्या काश्मिरी पंडितांसाठी सध्याचे वातावरण आशादायी आहे.
‘कलम ३७०’ आणि ‘कलम ३५अ’ रद्द करण्यात आल्यामुळे येथील परिस्थितीत अनेक चांगले बदल झाले आहेत. केंद्र सरकार प्रायोजित योजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होत आहे, असे ठाकूर म्हणाले. सरकारच्या विविध योजना आणि धोरणांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील ७० वर्षांत जे झाले नाही ते मोदी सरकारने करून दाखविले आहे, असा दावाही ठाकूर यांनी केला.
काश्मिरी पंडितांचे धरणे आंदोलन
जम्मू - काश्मिरी पंडितांच्या एका गटाने आज येथील राजभवनाच्या बाहेर धरणे आंदोलन केले. काश्मिरी पंडित जम्मू आणि काश्मीरमधून विस्थापित झाल्याच्या घटनेला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्त या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
जम्मू आणि काश्मीरमध्ये ९०च्या दहशकात दहशतवाद उफाळून आल्यानंतर काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून जम्मू किंवा इतर राज्यांमध्ये पलायन करावे लागले होते. या घटनेला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काश्मिरी पंडितांनी जोरदार घोषणा देत त्यांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्याची मागणी केली. काश्मिरी पंडित परिषदेकडून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.