पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची महत्त्वाची धुरा सांभाळणारे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालाविषयी एक भाकीत सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. त्याचा भाजपलाच नव्हे, मित्र पक्षांनाही चांगला फायदा होईल, असं मत देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केलंय.
एनडीएला संधी!
देवेंद्र फडणवीस सध्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आहेत. भाजपने त्यांच्यावर प्रचाराची खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये संयुक्त जनता दलासह (जेडीयू) विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) आणि जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा या पक्षांचा समावेश आहे. एकूण 243 जागांपैकी 122 जागा संयुक्त जनता दल तर, भाजपकडे 121 जागा आहेत. दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातील जागा इतर मित्रपक्षांना देणार आहेत. आघाडी असली तरी, भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा महत्त्वाचा आहे. त्याचा फायदा इतर मित्र पक्षांनाही होईल, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.
काय म्हणाले फडणवीस?
बिहार निवडणुकी संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना फडणवीस म्हणाले, 'आम्ही जिथे जिथे प्रचारासाठी जात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतल्यानंतर लोकांचा उत्साह आणखी वाढतो. देशातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींवर खूप विश्वास टाकला आहे. या विश्वासाचा फायदा निवडणुकीत फक्त भाजपलाच नाही तर, इतर मित्र पक्षांनादेखील होईल.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.