रेशनचे धान्य न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू

file photo
file photo

झारखंडमध्ये भूकबळींचे सत्र अजूनही सुरूच

पाटणा: झारखंडमध्ये भूकबळींचे सत्र कमी होण्याचे नावच घेत नाही. 11 वर्षांची मुलगी आणि तरुण रिक्षाचालकाच्या मृत्यूनंतर आता आणखी एक भूकबळीची घटना समोर आली आहे. सरकारने मात्र हा तिसरा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. देवघर जिल्ह्यांतील भगवानपूर गावातील 62 वर्षीय रूपलाल मरांडी यांचा सोमवारी मृत्यू झाला. या वेळी बायोमेट्रिक मशीनवर अंगठ्याचा ठसा उमटत नसल्याने त्यांना गेले दोन महिने रेशनवरील धान्य दिले गेले नसल्याचे समोर आले आहे.

मृत मरांडी यांची मुलगी मानोदीच्या म्हणण्यानुसार, ""वडिलांच्या अंगठ्याचा ठसा बायोमेट्रिक मशीनवर उमटत नसल्याने आमच्या कुटुंबाला गेले दोन महिने रेशनवरील धान्य मिळत नव्हते. आम्हाला ऑगस्ट महिन्यात शेवटचे धान्य मिळाले. सध्या घरात धान्याचा एक दाणाही नव्हता. यामुळे गेले दोन दिवस आमच्या घरात चूलच पेटली नाही. एका शेजाऱ्याने थोडा भात दिला होता, तो खाऊनच आमचा परिवार कसे बसे जगत होतो.''

स्थानिक रेशन दुकानदार धर्मवीर चौधरीच्या मते, रेशन कार्डला रूपलाल यांच्या मुलीचाही अंगठा जोडलेला आहे. ऑगस्टमध्ये त्यांना धान्य देण्यात आले होते. दुर्गापूजेवेळी मानोदी धान्य खरेदीसाठी आली होती. मात्र, त्या वेळी मशीनशी त्यांच्या अंगठ्याचा ठसा जुळला नाही. तसे असेल तर धान्य कसे देणार?''

बीडीओ अशोक कुमार सोमवारी रात्री रूपलाल यांच्या घरी डॉक्‍टरांसह पोचले. ते म्हणाले,"" रूपलाल यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याने शवविच्छेदन केले जाणार नाही.''
झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांत झालेला हा तिसरा भूकबळी आहे. 40वर्षीय रिक्षाचालक वैद्यनाथ दास यांचाही भुकेनेच बळी घेतला होता. सिमडेगा जिल्ह्यांतील 11 वर्षीय मुलीने भात - भात अशी मागणी करतच श्‍वास सोडला, असे आता सांगितले जाते. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी मात्र मुलीचा मृत्यू मलेरियाने झाल्याचे म्हटले आहे.

गरिबांवर मोठा अन्याय
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व झारखंडच्या आदिवासी भागांत काम करणारे ज्यां द्रेज म्हणाले,""आपली पाठ थोपटण्यासाठी अधिकारी गरीब आदिवासींची नावे दारिद्रय निर्मलन रेषेच्या यादीतून वगळत आहेत. त्यामुळे खरे गरजू असलेल्या अनेक लोकांना रेशनवरील धान्य मिळेनासे झाले आहे. सरकारची ही नीती गरिबांविरोधातील आहे. त्यांच्यावर अन्याय करणारी आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com