चंदीगड- केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांमध्ये प्रामुख्याने पंजाबमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, हरियाणातील एका गावात संतप्त ग्रामस्थांनी आपल्या गावात भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. कर्नालमधील इंद्री गावातील कादराबादच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. जर भाजप किंवा जेजेपीच्या नेत्यांनी गावात घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चपलेचा हार घातला जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी गावाबाहेर एक बॅनर लावला आहे. जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल तोच गावात राहिल, असे बॅनरवर लिहिलण्यात आले आहे. केंद्र सरकारने लागू केलेले तिनही नवीन कृषी कायदे शेतकऱ्याच्या हिताचे नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.
शेतकरी गुरलाल सिंग म्हणाले की, सत्तेत बसलेले नेते शेतकऱ्यांवर जबरदस्तीने हे कायदे थोपवत आहेत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. इतक्यावरच न थांबते ते आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवत आहेत. त्यांना खलिस्तानी म्हटले जात आहे. क्षणोक्षणी शेतकऱ्यांना अपमानित केले जात आहे. हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही त्यांनी केली.
दुसरे एक शेतकरी कुलदीप यांनी म्हटले की, शेतकरी सरकारचे कोणतेच षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाहीत. सरकारच्या या धोरणांच्या विरोधात जेजेपी आणि भाजपच्या नेत्यांवर आम्ही बहिष्कार टाकला आहे. यावेळी त्यांनी बाजूच्या गावातील शेतकऱ्यांनाही भाजपला आणि जेजेपीला गावात बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.