नवी दिल्ली - भाजपने नेहमीप्रमाणे या खेपेसदेखील विकासाच्या मुद्याला प्राधान्य देत राम मंदिराचा मुद्दा बाजूला सारला आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर लढविली जाईल. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारदेखील आताच जाहीर केला जाणार नसल्याचे ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री वैंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. राज्यातील सध्याची स्थिती भाजपच्या बाजूने असून पंतप्रधान मोदी हेच विकासाचा चेहरा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेला समाजातील कनिष्ठ गटातील लोकांनी पाठिंबा दिला असून या उपाययोजनेचे दीर्घकालीन फळेही आपल्याला चाखायला मिळतील. उत्तर प्रदेशातील जे घटक भाजपपासून दूर होते ते आता यामुळे जवळ येऊ लागले आहेत, असा आम्हाला अहवाल प्राप्त झाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला मतदान केले या वेळेसदेखील हाच बदल पहायला मिळेल असे त्यांनी सांगितले.
राम मंदिर हा भाजपच्या जिव्हाळ्याचा विषय आहे; पण ती पक्षाची निवडणूक रणनीती नाही. राज्य सरकार विकासाच्या मुद्यावर फारसे गंभीर नाही. केंद्रात आणि राज्यामध्ये एकच सरकार असेल तर त्यामुळे विकासदेखील वेगाने होऊ शकेल. मागील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या तुलनेत या खेपेस आमच्या सरकारने मोठा निधी उत्तर प्रदेशला उपलब्ध करून दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
|