कानपूर (उत्तर प्रदेश): देशात कोरोना व्हायरसमुळे 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ठिकठिकाणी अडकलेले नागरिक चालत, सायकलने घराकडे निघालेले दिसतात. पण, सलग चालल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. एक युवक मुंबईहून उत्तर प्रदेशातील गावात पोहचला. पण, गावात गेल्यानंतर जीव सोडल्याची घटना घडली.
लॉकडाऊनमुळे प्रवासाची साधने बंद झाल्यामुळे अनेकजण चालत घराकडे निघालेले दिसतात. एक युवक मुंबईहून तब्बल 1600 किमी चालत उत्तर प्रदेशातील श्रावस्ती या गावी पोहचला. मुंबईहून आल्यामुळे त्याला गावकऱ्यांनी 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यास सांगितले. त्याला गावातील एका शाळेत ठेवण्यात आले. मात्र, गावात पोहचल्यानंतर 6 तासांनी या युवकाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल, असे डॉक्टरांनी सांगितले. पण, सलग चालल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, युवकाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आला आहे. मृतदेहाजवळ पोहोचलेल्या कुटुंबातील सदस्यांना त्याच शाळेत अलग ठेवण्यात आले आहे. मृतदेहाच्या कुटूंबियांनी सांगितले की, तब्बल 1600 किमी चालून त्याचे शरीर थकले होते. त्याच्यावर उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.