नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) चार महिन्यांपूर्वी गूढरीत्या बेपत्ता झालेल्या नजीब अहमद या विद्यार्थ्याच्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) द्यावा, अशी जोरदार मागणी विरोधकांनी राज्यसभेत केली. नजीब याच्या अपहरणामागे भाजपशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघटनेचा हात असल्याचा थेट आरोप करतानाच या संघटनेला मोदी सरकारने विशेष दर्जा दिला आहे का? असा संतप्त सवालही विरोधकांनी केला.
"तृणमूल'चे विवेक गुप्ता यांनी मांडलेल्या या लक्षवेधी सूचनेवर "जदयू'चे अली अन्वर अन्सारी यांनी नजीबच्या अपहरणात व त्यामागे काही काळेबेरे असून, या प्रकरणात "अभाविप'चे नेते सहभागी असल्याचा आरोप केला. अद्याप त्यांची साधी चौकशीही झालेली नाही, हे शिक्षण क्षेत्रात काय चालले आहे? असे अन्सारी म्हणाले. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अनुपस्थितीत सरकारच्या वतीने नजीब प्रकरणावर काहीही बोलण्याचे टाळले गेले.
राज्यसभेत आज नजीब अहमद बेपत्ता प्रकरणाने वातावरण गरम झाले. नजीब या शब्दाचा अर्थ उल्लेखनीय काम करणारा असा होतो, असे सांगून विवेक गुप्ता म्हणाले की, 14 ऑगस्ट 2016 रोजी अभाविप व इतर काही विद्यार्थी नेत्यांशी नजीबचे भांडण झाले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. मात्र, यात "जेएनयू'चे कुलगुरू व इतर अधिकाऱ्यांचे वर्तन आक्षेपार्ह आहे. हा राजकीय सूडाचा प्रकार असून, याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. हा विद्यापीठाचा विषय नसून कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे.
अन्सारी म्हणाले की, भाजपशी संबंधित संघटनेचा नजीब अपहरण प्रकरणात हात आहे. नजीब याला मारून टाकले जाते व सरकार चौकशीही करत नाही, हा असंवेदनशीलतेचा कळस आहे.
|