नवी दिल्ली : देशातील कोरोना साथीच्या विस्फोटाला काँग्रेसने पुन्हा केंद्राला जबाबदार ठरविले आहे. ‘या साथीच्या काळात सरकारच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा पाच लाख असल्याचे सांगितले जाते. परंतु सरकारच्या हलगर्जीपणामुळे ४० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे,’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
कोरोना साथीच्या तीन लाटांनी भारतातील कोट्यवधी नागरिकांना वेठीस धरले होते. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५ लाख २१ हजार ७५१ इतकी आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाचा दाखला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. सरकारी आकडे खोटे असल्याचा दावा करताना ते म्हणाले, की कोरोना काळातील मृतांची संख्या पाच लाख नाही, तर ४० लाख इतकी आहे.
राहुल यांनी म्हटले आहे,‘‘मोदी खरे बोलत नाहीत आणि बोलू देत नाहीत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही, असेच खोटे ते अजूनही सांगत आहेत. मी याआधीही सांगितले होते की सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना काळात ५ लाख नव्हे, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. आता मोदीजींनी आपले कर्तव्य पार पाडावे आणि प्रत्येक पीडित कुटुंबाला ४ लाख रुपयांची भरपाई द्यावी.’’ महागाई, देशातील जातीय प्रक्षोभ आणि कोरोना काळातील मृत्यू अशा अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून ट्विटद्वारे केंद्र सरकारला धारेवर धरीत आहेत.
आरोग्य संघटनेच्या पद्धतीवर शंका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा आधार घेतला आहे. कोरोनामुळे जगभरात एकूण किती जणांचा मृत्यू झाला, ते निश्चित करण्यात मोदी सरकार अडथळा आणत आहेत, असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, भारताने या अहवालाबाबत आपली प्रतिक्रिया देताना, भारतातील कोरोना मृत्युसंख्या निश्चित करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पद्धतीवरच शंका व्यक्त केली आहे. भारतासारख्या प्रचंड मोठ्या आकाराच्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशातील मृत्युसंख्या काढण्यासाठी गणितीय पद्धती वापरणे चुकीचे आहे. या पद्धतीवर भारताने आधीही अनेकदा आक्षेप व्यक्त केला होता, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.