पंजाबमधील स्फोटांमुळे केंद्र सरकार हादरले 

पंजाबमधील स्फोटांमुळे केंद्र सरकार हादरले 

नवी दिल्ली : पंजाबमध्ये निरंकारी संमेलनात झालेल्या बॉंबस्फोटांमुळे पंजाब सोबतच केंद्र सरकारही हादरले आहे. या स्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येदेखील अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पंजाबमध्ये दहशतवादाच्या पुनरुज्जीवनाचा पाकिस्तानचा सातत्याने प्रयत्न सुरू असून, गेल्या काही महिन्यांत धार्मिक नेत्यांवर हल्ला करून जातीय तेढ निर्माण करण्याचे षड्‌यंत्र राबविले जात आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी अलीकडेच पंजाबमधील अशांततेबद्दल जाहीर इशारा दिला होता. त्याच दोन दिवसांपूर्वी पठाणकोटच्या मार्गाने दहशतवादी दाखल झाल्याच्या बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली होती. त्यानंतर आज अमृतसरपासून अवघ्या पाच किलोमीटरवरील निरंकारी आश्रमात बॉंबस्फोट झाला. आश्रमात सत्संगासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमले असताना झालेल्या या बॉंबस्फोटांमुळे तीन जणांना प्राण गमवावे लागले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. 

छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेलेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह या स्फोटानंतर तातडीने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याशी दूरध्वनीवरून बोलले आणि केंद्रातर्फे सर्वतोपरी मदतीचे आणि कठोर कारवाईचे आश्‍वासन दिले. मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्‌विटद्वारे माहितीही दिली. 

दिल्लीत "हाय अलर्ट' 

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुप्तहेर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दिल्लीतील निरंकारी आश्रमाच्या बाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आश्रम परिसरात पोलिस, तसेच भाविकांनीही स्वयंस्फूर्तपणे सुरक्षा वाढविल्याचे सांगण्यात आले. ल्यूटन्स दिल्ली, तसेच राष्ट्रीय राजधानी परिसरामध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com