अमरावती - विशेष राज्याचा दर्जा यासह राज्यांच्या विविध मागण्यांबाबत केंद्र सरकार कडक धोरण का अवलंबत आहे, असा सवाल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. नायडू यांनी आज पक्षाचे कायदेशीर सल्लागार आणि अन्य नेत्यांसमवेत बोलताना भाजप सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली.
नायडू म्हणाले की, भाजप आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना आपण परत बोलावले असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही बाहेर पडलो आहोत. मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठरावही आणला आहे. तरीही केंद्र सरकार आडमुठ्याची भूमिका घेत आहे. यामागे काय राजकारण असू शकते, हे समजत नाही.
दरम्यान, तेलगू देसमने मंगळवारी केंद्र सरकारवर टीका करताना केंद्र सरकार लोकसभेतील अविश्वास ठरावाचा सामना करण्याअगोदरच पळ काढत असल्याचे म्हटले होते. हे कृती राजकीय आत्महत्या असल्याचे टीडीपीने म्हटले होते. नायडू यांनीही राज्याच्या विरोधात केंद्र कशासाठी कडक धोरण राबवत आहे, हे समजायला मार्ग नाही, असे नमूद केले होते.
|