चेन्नई - मुसळधार पावसामुळे चेन्नई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले होते. मरिना बीच भागात 30 सेंमी पावसाची नोंद झाली. गेल्या 31 ऑक्टोबरपासून चेन्नई, तिरुवल्लूर आणि कांचीपुरम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, असे तमिळनाडू सरकारने आवाहन केले आहे. मात्र, आज सकाळपासून शहरात पाऊस झालेला नाही; मात्र आकाश ढगाळ राहिले.
तिरुवरूरजवळ मंगल अग्राम येथे शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत शेतकरी आपल्या शेतातील पाणी काढण्याचे काम करीत होता. त्यामुळे 27 ऑक्टोबरपासून पावसामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आठ झाली आहे.
2015 सारख्या पुराची भीती
राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे 2015 सारख्या पुराची भीती नागरिकांमध्ये निर्माण होऊ नये यासाठी अण्णा द्रमुक सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन नागरिकांना सरकारतर्फे करण्यात आले आहे. त्याशिवाय शहरात साठलेल्या पाण्याचा निचरा होईल, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना घरातूनच काम करण्याचे आवाहन करीत रस्त्यावरील गर्दी कमी करावी, असे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. शहराच्या विविध भागांत आणि उपनगरात काल रात्री मुसळधार पाऊस पडला. डीजीपी कार्यालयाजवळील मरिना बीच येथे आज सकाळी संपलेल्या 24 तासांत 30 सेंमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे प्रसिद्ध मरिना किनाऱ्यावर पाणी साचले आहे. अण्णा विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठाने त्यांच्या सत्र परीक्षा रद्द केल्या आहेत. आगामी 24 तासांत किनारपट्टीवरील जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
|