चीनने द्विपक्षीय करारांचा भंग केल्यामुळेच सीमेवर चिंताजनक परिस्थिती निर्माण

India-and-China
India-and-China

नवी दिल्ली - पूर्व सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, चीनने द्विपक्षीय करारांचा भंग केल्यामुळेच सीमेवर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी आज ठणकावले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधीही परराष्ट्रमंत्र्यांनी चीनशी आतापर्यंतच्या सर्वात वाईट संबंधांचा हा कालखंड असल्याचे आणि याला चीनचे सीमेवरील वर्तन जबाबदार असल्याचे म्हटले होते. तसेच सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यासाठी चीनने पाच वेगवेगळी कारणे पुढे केली असली तरी प्रत्यक्षात चीनचा ताबारेषेमध्ये एकतर्फी बदलाचा हेतू असल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते. त्या मालिकेमध्ये आज दिल्लीत उद्योजकांचा महासंघ असलेल्या फिक्की या संघटनेच्या वार्षिक बैठकीच्या कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या आडमुठ्या भूमिकेला लक्ष्य केले. परराष्ट्रमंत्री म्हणाले, की या वर्षात घडलेल्या घडामोडी अतिशय चिंता वाढविणाऱ्या आहेत. यातून काही महत्त्वाचे मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दुसऱ्या पक्षाने (चीनने) ताबारेषेच्या आदराचे आणि सैन्य तैनात न करण्याचे द्विपक्षीय करार धुडकावल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. अर्थात, दोन्ही देशांच्या संबंधातील पेच कधीपर्यंत सुटेल यावर भाष्य करण्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी टाळले. यावर भविष्यवाणी करता येणार नाही, असे ते म्हणाले. 

सीमावाद आणि गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीमध्ये २० भारतीय जवानांच्या बलिदानानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव टोकाला पोचला आहे. लष्करी आणि राजनैतिक पातळीवर वाटाघाटींच्या झालेल्या फेऱ्या, तणाव कमी करण्यासाठी आणि सैन्य माघारीसाठी सहमती होऊनही ताबारेषेवरील परिस्थिती अद्याप ‘जैसे थे’ आहे.

चीनच्या उक्तीत आणि कृतीत फरक
भारताकडून वारंवार चीनला १९९३ आणि १९९६ च्या करारांची आठवण करून दिली जात आहे. काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सीमावाद शांतता आणि संवादातून सोडविण्याच्या चीनच्या उक्तींमध्ये व प्रत्यक्ष कृतीमध्ये तफावत असल्याचे टीकास्त्र सोडले होते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com