कमांडो निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र

कमांडो निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र

असामान्य शौर्याबद्दल हवाई दलाचे कमांडो कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना आज मरणोत्तर अशोक चक्र जाहीर करण्यात आले. शांततेच्या काळात दिला जाणारा हा सर्वोच्च शौर्य सन्मान आहे. जम्मू-काश्‍मीर लाइट इन्फंट्रीच्या चौथ्या बटालियनचे मेजर विजयंत बिश्‍त यांना कीर्ती चक्र जाहीर झाले आहे. राष्ट्रीय रायफल्सचे सार्जंट मिलिंद किशोर खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दलांसाठी ३९० पदके राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोषित केली. घोषित सन्मानांमध्ये एक अशोक चक्र, एक कीर्ती चक्र, १४ शौर्य चक्रे, २८ परमविशिष्ट सेवा पदके, चार उत्तम सेवा युद्ध पदके, अतिविशिष्ट सेवेसाठीचे दोन बार, ४० अतिविशिष्ट सेवा पदके, दहा युद्धसेवा पदके, सेना पदकांचे दोन बार (शौर्यासाठी) आणि ८६ सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे. या शिवाय, एक नौसेना पदक (शौर्य), तीन वायुसेना पदके (शौर्य), सेना पदकांसाठीचे दोन बार (सेवेप्रती निष्ठा), १३ नौसेना पदके (सेवेप्रती निष्ठा), १४ वायुसेना पदके (सेवेप्रती निष्ठा), विशिष्ट सेवा पदकासाठीचा एक बार आणि १२१ विशिष्ट सेवा पदकेही कोविंद यांनी घोषित केली. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी या शौर्य पदकांची घोषणा केली जाते.

जम्मू-काश्‍मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यातील चांदेरगर येथे १८ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या कारवाईत कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना दहशतवाद्यांबरोबर सामना करताना वीरमरण आले. सहा दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला दाद न देता निराला यांनी दोन बड्या दहशतवाद्यांना ठार केले. मात्र या मोहिमेत ते हुतात्मा झाले.

‘सीआरपीएफ’च्या दोघांना शौर्य चक्र 
झारखंडच्या लातेहरमधील नक्षलवादीविरोधी मोहिमेत दाखविलेल्या शौर्याबद्दल केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ‘कोब्रा’ कमांडोंना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. २०९ व्या बटालियनचे सहाय्यक कमांडंट विकास जाखड आणि उपनिरिक्षक रियाझ अस्लम अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. २०१६ मधील मोहिमेत जवानांनी सहा नक्षलवाद्यांना ठार करून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. लातेहर जिल्ह्यातील करमदीहच्या जंगलात झालेल्या धुमश्‍चक्रीत दीपक खैरवार आणि नागेंद्र यादव या म्होरक्‍यांसह सहा नक्षलवादी ठार झाले होते. 

‘आयटीबीपी’च्या १४ जणांना पदके 
उत्कृष्ट सेवेबद्दल भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) १४ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींची पोलिस पदके जाहीर झाली आहेत. भारत-चीनदरम्यानच्या ३४८८ किलोमीटर सरहद्दीचे रक्षण हे दल करते. त्याशिवाय अंतर्गत सुरक्षा आणि नक्षलवादीविरोधी मोहिमांमध्येही या दलाचा सहभाग असतो. 

‘सीआयएसएफ’च्या ३२ जणांना पदके 
उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ३२ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींची पोलिस पदके जाहीर झाली आहेत. त्यात पोलिस उपमहानिरीक्षक एन. जी. गुप्ता, वरिष्ठ कमांडंट नरेश कुमार आदींचा समावेश आहे. देशातील सुमारे ५९ नागरी विमानतळांच्या रक्षणाची जबाबदारी या दलावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com