काँग्रेसचा बळी देऊन महाआघाडी नको : सलमान खुर्शिद

काँग्रेसचा बळी देऊन महाआघाडी नको : सलमान खुर्शिद

नवी दिल्ली : सध्याच्या काळात स्वबळावर सत्ता स्थापन करणे कठीण बाब आहे, मात्र कॉंग्रेसचा बळी देऊन विरोधकांची महाआघाडी होऊ नये, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी व्यक्त केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवणे, हाच अजेंडा राहणार असून प्रसंगी सहकाऱ्यांना गमावण्याची आणि आघाडीत ताळमेळ बसवण्यासाठी तयार राहावे, असेही खुर्शिद यांनी म्हटले आहे. 

केंद्रातील सरकार बदलण्यासाठी महाआघाडीची नितांत गरज असल्याचे आमच्या सर्वच नेत्यांनी मत व्यक्त केले आहे. भाजपला कोणत्याही स्थितीतून केंद्रातून जावे लागणार आहे. यासाठी सर्व पक्षांची महाआघाडी करणे गरजेचे असून, त्यासाठी प्रसंगी त्यागाची, चर्चेची आणि समन्वय करण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी कॉंग्रेस सज्ज असल्याचे खुर्शिद म्हणाले.

अर्थात, अन्य विरोधी पक्षांचीदेखील अशीच भूमिका असायला हवी. महाआघाडी करताना कॉंग्रेसचा बळी जाऊ नये. भाजपला हटवण्यासाठी महाआघाडी व्हावी आणि यासाठी आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहोत, असे खुर्शिद यांनी स्पष्ट केले. 

एकट्याच्या जिवावर सरकार स्थापन करणे आजच्या घडीला कठीण आहे. स्वबळाचा उद्देश असेल, तर आपल्याला पाच वर्षे काम करावे लागेल. कारण तीन वर्षे आघाडीसमवेत काम करून अचानक शेवटच्या टप्प्यात तुम्ही स्वबळाची भाषा करू शकत नाही. यासाठी आपल्याला पाच वर्षे लढावे लागेल. आजही आम्ही महाआघाडीसाठी कटिबद्ध आहोत. महाआघाडी यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वोपतरी आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन प्रयत्न करण्यास तयार आहोत, असे खुर्शिद म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com