Loksabha 2019 ः काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी; 10 मार्चपर्यंत सर्व उमेदवार जाहीर करू- आंबेडकर

Loksabha 2019 ः काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी; 10 मार्चपर्यंत सर्व उमेदवार जाहीर करू- आंबेडकर

लोकसभा 2019 ः अकोला : हिंदूत्व आणि हिंदू राष्ट्र हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. काँग्रेसही सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा संदेश त्यांच्या कृतीतून देत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. सध्या त्यांनी हे पत्र ट्विटरवरून काढून टाकण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत समावून घेण्यासंदर्भात चर्चा करण्याच्या उद्देशाने २८ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यातर्फे  प्रकाश आंबेडकर यांना पत्र देण्यात आले होते.

त्या पत्राला उत्तर देताना आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीसोबत जून २०१८ पासून सुरू असलेल्या आघाडीच्या चर्चेबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत एकही जागा भारिप-बमसंला देण्यास असमर्थता दर्शविणारी काँग्रेस २०१९ च्या निवडणुकीत सुरुवातीला दोन जागा देण्याची भाषा करीत होती. मात्र, वंचित घटकातील मतदार भाजपकडे वळला असल्याने आणि भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर पराभव पुढे दिसताच काँग्रेसने चार जागा वंचित आघाडीला देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, आता केवळ जागांचा प्रश्‍न राहिलेला नसून, काँग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा जो संदेश दिला जात त्यावर चर्चा करण्याचे संकेत आंबेडकर यांनी दिले आहेत.

त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आरएसएसला संविधानाच्या चाैकटीत आणण्यासाठी काँग्रेसची भूमिका काय? त्यासाठी त्यांची कोणती तयारी आहे? याबाबत विचारणा केली आहे. आंबेडकर यांनी या पत्रातून काँग्रेससोबत आघाडीची बोलणी पुढे सुरू ठेवण्याचे संकेतही दिले आहेत. 

सर्वांच्या सहभागातूनच आराखडा
आरएसएस किंवा कोणत्याही संविधान बाह्य संघटना यांच्यावर नियंत्रण आणणे ही सर्व देशासाठी आणि सर्व धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या पक्षांसाठी आणि नागरी संघटनांसाठी महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. तो राज्य पातळीवरील निर्णय नाही. काँग्रेसप्रणित महाआघाडीमध्ये सहभागी पक्षांमधील विधी तज्ज्ञ यांची समिती गठित करून या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यात आमचे प्रतिनिधित्व निश्चित असेल. तो मसुदा फक्त आम्ही व तुम्ही या दोघांमधालाच न राहता तो धर्मनिरपेक्षता मानणान्या सर्व पक्षांच्या संदर्भात करता येईल, असे आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे. 

...तर 10 मार्चनंतर सर्व उमेदवार होतील जाहीर
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलेल्या पत्रानंतर आता काँग्रेसकडून त्यांना कोणते उत्तर दिले जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आघाडीबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही तर 10 मार्चनंतर वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्व जागांवरील उमेदवार घोषित केले जातील, असे संकेत आंबेडकर यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com