नवी दिल्ली - पाण्याचे फुगे अंगावर टाकणाऱ्या एका मुलाला वाचविण्यास गेलेल्या एकाला दुचाकीवरून आलेल्या एका गटाने मारहाण करीत चाकू भोसकून त्याची हत्या केल्याची घटना येथे घडली. दिल्लीच्या खानपूर भागात गुरुवारी ही घटना घडली. हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आशिष असून त्याला 50 वेळा चाकू भोसकून मारण्यात आले.
आशिष आपल्या स्कूटरवरून जिमहून घरी चालला होता. घरी जाताना दुचाकीवरून चाललेल्या दोन जणांवर एका मुलाने पाण्याचे फुगे टाकले, त्यानंतर त्यांनी या मुलाला मारहाण करण्यास सुरवात केली. त्या वेळी आशिष या मुलाला सोडविण्यासाठी गेला होता.
त्या वेळी या दुचाकीवाल्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी आशिषवर हल्ला केला. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला असून दहा दुचाकीवरून आलेल्या 20 जणांनी हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.
होळीनिमित्त कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची कडक व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन होणार नाही, याकडेही लक्ष ठेवून ते होते. गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, मद्यपान करुन गाडी चालवून वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे विशेष पोलिस उपायुक्त आणि दिल्ली पोलिसांचे मुख्य प्रवक्ते देपेंद्र पाठक यांनी सांगितले.
|