Delhi Election:भाजपची आप विरोधात स्ट्रॅटेजी; 40 स्टार प्रचारक रिंगणात  

amit-shah
amit-shah

नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या जबरदस्त आव्हानाचा मुकाबला करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने प्रचारासाठी देशभरातील नेत्यांची फौज उतरविण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी, खासदार सुनील दत्त, हंसराज हंस, भोजपुरी सुपरस्टार दिनेशलाल यादव ऊर्फ निरहुआ आणि खासदार मनोज तिवारी आदींचा यात समावेश आहे. दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान आणि 11 रोजी निकालांची घोषणा होणार आहे. 

भाजपने आज दिल्लीसाठी 40 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. बिहारी, पूर्वांचली, पंजाबी, हिमाचली, उत्तराखंडी आदी मतपेढ्यांचा विचार करून व ध्रुवीकरणाचे कार्ड जोरात चालावे, यादृष्टीने ही यादी बनविण्यात आल्याचे दिसते. मात्र, मराठी लोकसंख्या लक्षणीय असूनही महाराष्ट्रातील एकाही नेत्याला दिल्लीत प्रचारासाठी बोलाविलेले नाही. केंद्रात काम करणारे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे मंत्री व दिल्ली भाजपचे प्रमुख श्‍याम जाजू यांचीच नावे यादीत दिसतात. 

पक्षांतर्गत नेत्यांच्या वादावादीत अनेक मतदारसंघांत भाजपला "आप'समोर कमकुवत उमेदवार उतरविणे भाग पडले आहे. नवी दिल्लीत तर केजरीवालांसमोर भाजपकडे तुल्यबळ उमेदवारच नसल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, विजय गोयल, मंत्री हरदीप पुरी आदींनी हात वर केल्यावर सुनील यादव यांना पक्षाने अखेरच्या क्षणी तिकीट दिले. यादव यांच्याबाबत गुगल गुरूकडेही माहिती मिळत नसल्याची कुजबुज दिल्ली भाजप कार्यकर्त्यांत ऐकायला मिळते. केजरीवाल यांनी काल उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला सात तास तिष्ठत ठेवल्याचाही सहानुभूतीचा मुद्दा बनविल्याने भाजप नेते चक्रावून गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पक्षाने आज जाहीर केलेल्या 40 जणांच्या यादीत दिल्लीचे सात खासदार व योगी यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. याशिवाय संघटनमंत्री बी. एल. संतोष, शिवराजसिंह चौहान, मुख्तार अब्बास नक्वी, नित्यानंद राय आदींच्याही नावांचा यात समावेश आहे. मात्र, भाजपची सर्वाधिक भिस्त मोदी, शहा, योगी व स्मृती इराणी यांच्यावरच असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. 

कॉंग्रेसकडून मुस्लिम समाजाची दिशाभूल : संबित पात्रा 
सीसीए व एनआरसीबाबत खोटी माहिती पसरवून मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात कॉंग्रेसचा सर्वांत मोठा हात असल्याचा आरोप भाजपने आज केला. यासाठी भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. या निदर्शनांच्या आडून हिंदू समाजाला शिव्या देण्याचे काम कॉंग्रेसने केल्याचा आरोप पक्षप्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. चव्हाण यांच्या वक्तव्यातून हेच दिसते, की कॉंग्रेस फक्त मुलसमानांची परवानगी घेऊनच राज्यांतील सरकारे बनविते. हैदराबादचे आमदार अकबरुद्दीन यांनी लाल किल्ला, कुतुबमिनार, चारमिनार हे तुझ्या बापाने बनविले का? हा सवाल कोणासाठी होता? असेही पात्रा यांनी संतप्तपणे विचारले आणि देशाच्या पंतप्रधानांबद्दल गलिच्छ भाषा भाजप ऐकून घेणार नाही, असाही इशारा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com