भारताचा मानवी विकास निर्देशांक उंचावला

भारताचा मानवी विकास निर्देशांक उंचावला

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) जाहीर झालेल्या मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताचा क्रमांक 130 वा आहे. यात एकूण 189 देशांचा समावेश आहे.

दक्षिण आशिया विभागात भारतात मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य सरासरी 0.638 आहे. साधारण समान लोकसंख्या असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांचा क्रमांक अनुक्रमे 136 व 150 आहे. 2016 मध्ये भारताचे "एचआयडी' मूल्य 0.624 होते तर क्रमांक 131 वा होता. मानवी विकासाची तीन स्तरांवरील दीर्घकालिन प्रगतीचे मोजमाप म्हणजे "एचआयडी' असे समजले जाते. हे स्तर म्हणजे दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञान मिळण्याची संधी व चांगली जीवनशैली या तीन स्तरांवर प्रगतीचे मूल्य मोजले जाते. 

भारताचे यश 
भारताचे "एचआयडी' मूल्य 2017 मध्ये 0.640 होते. त्यामुळे भारताची गणना मध्यम मानवी विकास गटात करण्यात आली आहे, अशी माहिती "यूएनडीपी'च्या मानवी विकास अहवालात दिली आहे. 1990 आणि 2017 दरम्यान भारताचे "एचडीआय' मूल्य 0.427 वरून 0.640 पर्यंत म्हणजे सुमारे 50 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. देशातील तळागाळातील नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे हे द्योतक आहे, असे अहवालात म्हटले आहे. 

विकसित देश अग्रस्थानी 
एचडीआय' निर्देशांक यादीत नॉर्वे, स्वीत्झर्लंड, ऑस्ट्रेलिया व जर्मनी हे देश अग्रस्थानी आहेत. नायगेर, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, दक्षिण सुदान, छाड व बुरुंडी आदी देशांची प्रगती आरोग्य, शिक्षण व उत्पन्न या स्तरांवर फारशी चांगली नसल्याने यादीत त्यांचे स्थान तळात आहे. अनेक देश मानवी विकासात सुधारणा करीत असल्याचे चित्र जगभरात दिसत आहे. 189 देशांमधील "एचडीआय' मोजणी करण्यात आली. त्यापैकी 59 देशांमध्ये मानवी विकास गटाचा वेग उच्च आहे तर केवळ 38 देश यात मागे असल्याचे दिसून येते. भारताने शैक्षणिक विकास व दरडोई उत्पन्नात आघाडी घेतली असली तरी असमानता हे मुख्य आव्हान देशापुढे आहे. आर्थिक विकासालाही ते मारक ठरत आहे. 

महिलांची पीछेहाट 
कायदा व धोरण या पातळीवर भारताची प्रगती समाधानकारक दिसत असली तरी राजकीय, आर्थिक व सामाजिक पातळीवर महिला पुरुषांपेक्षा सामर्थ्यात मागे असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविले आहे. उदा. संसदेत महिलांची संख्या 11.6 टक्के आहे. शैक्षणिक पातळीवर माध्यमिक शाळेची पायरी चढणाऱ्या महिलांचे प्रमाण केवळ 39 टक्के आहे. पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण 64 टक्के आहे. श्रम क्षेत्रातही पुरुषांचेच वर्चस्व आहे. काम करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 78. 8 असून महिलांचे प्रमाण27.2 आहे. मात्र स्त्री-पुरुष असमानता निर्देशांत भारताची कामगिरी बांगालादेश व पाकिस्तानपेक्षा सरस आहे. यात 160 देशांमध्ये भारत 127 व्या क्रमांकावर आहे. 

"एचआयडी'चा अहवाल -
189 - एकूण देश
130 - भारताचा क्रमांक
136 - बांगलादेशचा क्रमांक
150 - पाकिस्तानचा क्रमांक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com