महाराष्ट्राच्या मातीत उगवून राज्यभर हरितक्रांती करणारे क्रांतिकारी असंख्य आहेत. पण, मराठी मातीत रूजून जगभर क्रांती करणारे मोजकेच लोक आहेत. त्यात डॉ.पांडूरंग सदाशिव खानखोजे यांचे नाव आदराने घ्यावे असेच आहे. आज खानखोजे यांची पुण्यतिथी आहे.
डॉ.पांडूरंग खानखोजे यांचे कार्य भारतातील कमी लोकांना माहिती असले तरीही अमेरिकेत त्यांना देवमाणूसच मानले जाते. पण, या खडतर प्रवासात त्यांना एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम करावे लागले. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.
पांडुरंग खानखोजे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1884 रोजी वर्धा येथील पालकवाडी या ठिकाणी झाला. त्यांचे वडील सदाशिव व्यंकटेश खानखोजे यांचा व्यवसाय न्यायखात्यातील ‘पिटिशन रायटर’ म्हणजे अर्ज लिहिण्याचा होता.
ते कटोलहून पालकवाडी येथे स्थलांतरित झाले. तिथेच पांडुरंगाचं प्राथमिक मराठी शिक्षण झालं. त्यानंतरचं माध्यमिक शाळेतलं इंग्रजी चौथ्या वर्षाचं शिक्षण पूर्ण करून तो नागपूरला नील सिटी हायस्कूलमध्ये दाखल झाला. त्याच्या माध्यमिक शाळेतील शिक्षणाबरोबरच त्याने देशभक्तीचे धडे गिरवले. थोडा मोठा झाल्यावर ‘बांधव समाज’ या देशभक्तांच्या संघटनेने लोकजागृतीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळात त्यांनी शेतकर्यांचे मेळावे घेतले. क्रांतीसाठी सैनिकी शिक्षणाप्रमाणेच आपण शेतीशास्त्रही शिकलं पाहिजे असा महत्त्वाचा विचार त्यांच्या मनावर कायमचा ठसला.
सशस्त्र क्रांन्तीचा मार्ग धरून ते जपानला पोहचले. जपानला पोहचण्याचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे याच काळात १९०४ मध्ये जापानी सैन्याने सोव्हियत युनियनच्या सैन्याला धूळ चारली होती. या युद्धनितीचा अभ्यास करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.
याच काळात म्हणजे १९०६ साली सेन फ्रांन्सिस हे अमेरिकेतलं शहर भूकंपामुळे बेचिराख झालं होतं. या शहराच्या पुर्नबांधणीसाठी चीनमधून अनेक मजूर अमेरिकेला जाणार होते. अशाच एका जहाजात बसून डाॅ. खानखोजे अमेरिकेत पोहचले.
सेन फ्रांन्सिस्कोमध्ये मात्र डॉ. खानखोजे यांच्या ओळखीचे कोणी नव्हते. दोन वेळेच्या जेवणासाठी त्यांची वणवण झाली. उपजीविकेसाठी त्यांनी एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करावे लागले.
1911मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या आरेगॉन येथील अॅग्रिकल्चरल कॉलेजातून त्यांनी कृषिशास्त्राची बी.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी ते पंचवीस वर्षांचे होते. या पदवीमुळे त्यांना वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात नोकरी मिळाली. तेथूनच 1913मध्ये त्यांनी पुढची एम.एस्सीची पदवी मिळवली. त्या वेळी त्यांनी शेतावर काम करून आपली आर्थिक गरज भागवली.
हा पदवी अभ्यास करताना सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी त्यांचा खूप जवळून संबंध आला. त्यामुळे शेतकरी समाजाला उपयुक्त अशा कृषिकार्याचं महत्त्व त्यांच्या मनावर ठसलं. म्हणून पुढचं शेतीविषयक शिक्षण त्यांनी चालूच ठेवले.
त्यानंतरच्या काळात त्यांनी काही वर्ष मेक्सिकोला आपली कर्मभूमी बनवले. इथेच त्यांनी शेतीतील संशोधन करण्यासाठी वाव मिळाला.
1949 मध्ये स्नेही जी. अनंतन म्हणजे अनंत गणेश देवकुळे यांना पत्र लिहून भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली. जी. अनंतन हे ‘आपली शेती’ या मासिकाचे संपादक होते. मध्य प्रदेशचे तत्कालीन कृषी मंत्री रा.कृ. पाटील यांना त्यांची ही इच्छा समजली. काही अटींवर त्यांनी कृषिसुधार समितीचं काम करण्यासाठी खानखोजेंना निमंत्रित केलं. मात्र एप्रिल 1949मध्ये परतल्यावरही त्यांना मुंबईच्या पोलिसांनी अटक केली, कारण ब्रिटिशांनी तयार केलेल्या काळ्या यादीत त्यांचं नाव अजूनही होतं. परंतु योग्य शासकीय छाननी होऊन त्यांना मुक्त केलं गेलं.
त्यानंतर ते कायमचे भारतातच वास्तव्यास होते. जगभर हरितक्रांती करणाऱ्या या संशोधकाचे १९६७ मध्ये झोपेत असतानाच वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.