नवी दिल्ली - बनावट कंपन्यांमार्फत आठ हजार कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी दिल्लीतील दोन भावांविरोधात सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
दिल्लीस्थित व्यावसायिक बंधू सुरेंद्र जैन आणि वीरेंद्र जैन यांच्याविरोधात "ईडी'ने आरोपपत्र दाखल केले. या दोघांनी बनावट कंपन्यांमार्फत सुमारे आठ हजार कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. "ईडी'ने त्यांच्या 1.12 कोटी रुपये किमतीच्या शेतजमिनीसह 65.82 कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त केली आहे. त्यांच्या जप्त मालमत्तेत दिल्लीमधील द्वारका येथील रॅडिसन ब्लू हॉटेलचाही समावेश आहे. सध्या जैन बंधू कारागृहात आहेत.
"ईडी'ने याप्रकरणी 90 बनावट कंपन्या शोधल्या आहेत. या कंपन्या चालू आणि बंद होण्याच्या अगदी कमी तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण आठ हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहेत. राजकीय लागेबांधे असलेल्या व्यक्तींची काळा पैसा पांढरा करण्यासाठी या बनावट कंपन्यांचा वापर झाल्याचा "ईडी'चा संशय आहे.
|