पालन झाले नसले तरीही 'प्रारंभ चांगला' 

पालन झाले नसले तरीही 'प्रारंभ चांगला' 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात यंदा घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे सर्वत्र उल्लंघन झाले असले तरीसुद्धा सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि कायदाक्षेत्रातील तज्ज्ञांनी एक सुरवात म्हणून ही एक चांगली बाब असल्याचे मत मांडले आहे. न्यायालयाच्या आदेशांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती पण तज्ज्ञांनी मात्र यावर काहीसा सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन मांडला आहे. 

दीर्घकाळाचा विचार केला तर या आदेशाची अंमलबजावणी करणे सहज शक्‍य आहे, आता जरी हे फार मोठे आणि प्रचंड काम वाटत असले तरीसुद्धा भविष्यात न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांना जबाबदार धरायला हवे, असे काहींचे म्हणणे आहे. 

दिल्ली पुन्हा गुदमरली 

दिल्लीमध्ये यंदाही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शहरातील प्रदूषणाची पातळी खालावली होती, फटाक्‍यांमुळे हवेतील प्रदूषण दहापटीने वाढले होते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या न्यायालयाच्या आदेशांवर अंमलबजावणी झाली नसली तरीसुद्धा यामुळे प्रदूषण नियंत्रणासंदर्भात धोरण निश्‍चित करण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

आदेशातील संदेश 

बऱ्याचदा उत्सवाच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होऊ शकत नाही, पण काही भागांमध्ये मात्र या आदेशांना जेव्हा सामाजिक संदेशाचे रूप येते तेव्हा मात्र ते यशस्वी होताना दिसतात, असे ज्येष्ठ विधीज्ञ राजीव धवन यांनी म्हटले आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी कायदा आणि सुव्यवस्था ठेवणाऱ्या संस्थांना जबाबदार धरावे असा सूर काही तज्ज्ञांनी आळवला आहे. 

दिल्ली पोलिसांवर ठपका 

देशाच्या अनेक भागांमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे पालन झाले असून दिल्लीमध्ये मात्र हा आदेश यशस्वी झाला नाही त्याला दिल्ली पोलिसच कारणीभूत असल्याचे विधीज्ञ गोपाल सुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे. प्रदूषणाच्या विषयावर न्यायालयाच्या मित्र बनलेल्या अपराजिता सिंह यांनी या सकारात्मक आदेशांचे पालन झाले नसल तरीसुद्धा हे सर्वांत मोठे पाऊल आहे असे म्हटले आहे. 

लोकांना भान हवे 

"सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्न्मेंट' या संस्थेच्या कार्यकारी संचालिका अनुमिता रॉय म्हणाल्या की, ""फटाक्‍यासंदर्भात अनेक कायदे अस्तित्वात असले तरीसुद्धा आता लोकांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे.'' या आदेशांची अंमलबजावणी व्हायला वेळ लागेल; कारण लोक हळूहळू त्यांच्यामध्ये बदल करत असतात, असे ऍड. राकेश द्विवेदी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com