हरिद्वार- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे (आज) रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आले. सकाळी दिल्लीहून अस्थी कलश आल्यानंतर भल्ला महाविद्यालयाच्या मैदानावर हर-की-पौडी पर्यंत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी विधी पार पाडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या नमिता यांनी वाजपेयींच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या. यावेळी वातावरण अतिशय भावूक झाले होते.
तत्पूर्वी, अटल बिहारी वाजपेयींची अस्थिकलश यात्रा काढण्यात आली होती. यावेळी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते अस्थी विसर्जन कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच, या कार्यक्रमात भाजपाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. हरिद्वारमध्ये दोन किलोमीटरपर्यंत अस्थी विसर्जन यात्रा निघाली होती.
दिल्लीतल्या स्मृती स्थळी ठेवण्यात आलेल्या अस्थींचं वेगवेगळ्या कलशांमध्ये विभाजन करण्यात आलेलं होतं. वाजपेयींच्या अस्थी देशभरातल्या 100 नद्यांमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर, अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीतल्या जाधव स्टेडियममध्ये सोमवारी सर्वदलीय प्रार्थना सभा होणार आहे. सर्व राज्यांतील राजधान्यांमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन केलं जाणार आहे. अटलजींचे अस्थिकलश शांतिकुंजचे संस्थापक पं. श्रीराम शर्मा आचार्य आणि माता भगवती देवींच्या समाधीस्थळी ठेवण्यात येणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.