केंद्रीय मंत्र्यांनी थेट राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर थेट निशाणा साधलाय
मागील काही दिवसांपासून देशातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय पटलावरील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, यंदा रामनवमीनिमित्त देशाच्या विविध भागांत काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यातून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यातून राजकारण्यांना धार्मिक तेढ निर्माण करायचा होता, अशी चर्चाही सुरु आहे. आता याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh Bjp) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'रामनवमीच्या मिरवणुका आता पाकिस्तानात काढायच्या का,' या सवालामुळे आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ते म्हणाले, रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले हे 'गंगा-जमुना तेहजीब'चे दावे करणाऱ्यांना चपराक आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या देशात मोठ्या संख्येने नव्या मशिदी उभ्या राहिल्या आहेत. त्याला कुणीही विरोध केला नाही. मुस्लिमांची लोकसंख्या अनेक पटीने वाढली. त्याच वेळी पाकिस्तानात मात्र हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. तेथील हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता मात्र सहनशक्तीचा अंत होत चालला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
रामनवमीला देशात ठिकठिकाणी झालेल्या हल्ल्यांबाबत विचारले असता ते म्हणाले, आता रामनवमीच्या मिरवणुका पाकिस्तानात, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानात काढायच्या का? असे हल्ले दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या मिरवणुकांवर झाले असते तर राहुल गांधी, लालूप्रसाद यादव यांच्यासारखे नेते रस्त्यांवर उतरले असते, अशी टीकाही त्यांनी केली. या देशाची १९४७मध्ये फाळणी झाली. हिंदू बहुसंख्याक व मुस्लिम बहुसंख्याक भाग असा भेदभाव करून इतिहासातील चूक पुन्हा करता कामा नये,' असे सांगतच 'मुहर्रमच्या ताजियामध्ये हिंदूंनी नेहमीच मनोभावे सहभाग घेतला,' याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधी, आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर थेट निशाणा साधल्यानं आता कॉंग्रसे यावर कोणती भूमिकी घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.