देवाची तिजोरी...

देवाची तिजोरी...
देवाची तिजोरी...

खूप प्राचीन इतिहास आणि वारसा लाभलेल्या भारतावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली. त्यामागे अनेक कारणे होती, त्यातील महत्त्वाचे कारण होते ते या भूमीतील संपन्नता. असं सांगतात की, इथं सोन्याचा धूर निघत होता. ही अतिशयोक्ती वाटत असेल, पण तेवढी संपन्नता या देशात होती, हे खरे. त्यामुळेच व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिशांनी या देशावर दीडशे वर्षे राज्य केले. औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावरील ब्रिटिशांनी येथील साधन संपत्तीची लूट केली आणि आपल्या उत्पादीत मालाला वसाहत केलेल्या भारताला हक्काची बाजारपेठ बनवले. खूप पुर्वी  आक्रमणकर्त्यांनी गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटले, असा इतिहास आहे. त्यामागे तेथे असलेली संपत्ती हेच कारण होते. भारतातील मंदिरे, धर्मशाळा, बौद्ध भिक्खूंची विहारे यांना परकियांनी संपत्तीच्या लालसेपोटी लक्ष्य केले. त्यांची लूट केली. दक्षिणेतील पद्मनाभ मंदिर हजारो कोटींची माया बाळगून आहे. तिरुपतीचे बालाजी देवस्थान, शिर्डीचे साईबाबा, मुंबईचा सिद्धीविनायक यांच्या दानपेटीतील ओघ इतका आहे की, पुरेपुरे म्हणावा अशी त्यांची अवस्था आहे.

जेव्हा केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तेव्हाही बँकांकडील रोकडची नोंद घेतली, त्याचप्रमाणे मंदिरांच्या तिजोऱ्यांकडे आपली करडी नजर वळवली. सरकारने नोटाबंदीचा निर्णय कार्यवाहीत आणून तीन आठवडे उलटले. आजमितीला देशातल्या अनेक प्रांतातल्या देवस्थानांच्या तिजोऱ्या फुल्ल झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत देवस्थानांचे उत्पन्न वाढले आहे. नव्हे सुट्या नोटांच्या समस्येवर मात करण्यासाठी बँकांच्या मदतीला या तिजोऱ्याच येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या काही दिवसांतील चित्र पाहिले तर बहुतांश देवस्थानातील गंगाजळीत खूप मोठी वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशातील प्रमुख देवस्थानात मिळून 200 कोटींवर रक्कम जमा झाली आहे. यात प्रसिद्ध तिरुपती देवस्थान आघाडीवर आहे. तिथे दररोज अडीच ते तीन कोटी एवढी रक्कम जमा होते. याशिवाय, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्रसह उत्तर भारतातील अनेक देवस्थानांमधील मंदिरातील दानपेट्या सरकारसह भक्तगणांना आठवल्या, हा काळाचा महिमा म्हणायचा की, संकटकाळी देवाला घातलेले साकडे म्हणायचे.

जगभरातील देवस्थाने आणि त्यांच्याकडील रोकडसह असलेली विविध प्रकारची संपत्ती ही एका श्रद्धेच्या भावनेतून निर्माण झालेली असते. श्रद्धा ही अत्यंत व्यक्तीगत बाब आहे. त्यामुळे त्यांचा आदरच केला पाहिजे. परमेश्वराच्या अर्पण केलेले पावन होते. पण तेच दान गरजूंच्या पदरात पडले तर त्यांच्या जीवनात सौख्य, समाधानाचा दिवा प्रवेश करून त्यांचे जगणे आनंदाचे करू शकतो. धर्मादाय म्हणून विविध देवस्थाने, धार्मिक संस्था यांच्याद्वारे रुग्णालये, शाळा, धर्मशाळा, निराश्रीत, परित्यक्ता, उपेक्षित घटकांसाठी उपक्रम राबवले जातात, अन्नछत्र चालवले जातात. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी असे उपक्रम राबवले जातात. या सर्वांचे स्वागतच. पण ज्या देशातील 56 टक्के संपत्ती 1 टक्का धनिकांच्या हाती एकवटलेली असते, त्या देशातील गरिब-श्रीमंतांच्या दरीचा तळ किती खोलवर असेल, याची कल्पना येते.

देवांच्या चरणी येणारा पैसा-आडका हा श्रद्धेतूनच येतो. परोपकाराची शिकवण प्रत्येक धर्म देतो. मग याच संपत्तीचा अधिक व्यापक, परिणामकारक विनियोग झाला तर कदाचीत या संपत्तीचे चीज झाले, असे म्हणता येईल. जनतेत असेल हरी तर देईल खटल्यावरी या भावनेपेक्षा, जिथे राबती हात तिथे हरी, हा स्वउत्थानाचा मंत्र रुजवणारे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. या तिजोरींमधील पैसा विधायकतेसाठी, विकासाची बेटे निर्माण करण्यासाठी वापरला पाहिजे. श्रद्धेला मानवसेवेची जोड अधिक व्यापक केली पाहिजे. कोणत्याही बाबतीत साचलेपण आले की, त्याचा उबग यायला लागतो. त्यांच्या भावनेच्या, श्रद्धेच्या बळावर त्या तुडूंब भरल्या त्यातील दातृत्वाचा अंगिकार देवस्थांनांनीही केला पाहिजे. कवी विंदा करंदीकरांनी या दातृत्वगुणाचा म्हणूनच तर गौरव केला आहे - देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com