लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election BJP Victory) भाजपने बहुमत मिळविले आहे. उच्च दर्जाची कायदा आणि सुव्यवस्था यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी (Minister Ajay Mishra Teni) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी टेनी यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गाडी घातली होती. त्यांनीच असं वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसती, तर भाजपला विधानसभेत बहुमत मिळाले नसते. आम्ही येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्येही असंच बहुमताने सरकार स्थापन करू'', असंही अजय मिश्रा म्हणाले.
काही महिन्यापूर्वी अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्राने लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथील शेतकरी आंदोलनावर गाडी चालवली होती. यावेळी हिंसाचार झाला होता. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच एक पत्रकार आणि अन्य तिघे जण ठार झाले होते. त्यानंतर आशिष मिश्रासह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक देखील करण्यात आली होती. आशिष मिश्रा सध्या जामिनावर बाहेर असून, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी त्याविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. जामीन आदेशाला आव्हान देणारी याचिका चार मृत शेतकर्यांपैकी तीन शेतकर्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती.
ज्या मंत्र्यांच्या मुलाने कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केले होते त्याच मंत्र्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. खरंच उच्च दर्जाच्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळे उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.