अहमदाबाद Congress Rahul Gandhi : राज्यसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना आणि मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसची स्थिती नाजूक बनलेली असताना आता, गुजरातमध्येही कॉंग्रेसला धक्का बसला आहे. गुजरातच्या चार आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे राजीनामे सोपविले आहेत. हे राजीनामे मंजूरही केल्याचेही म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपचा झेंडा हातात घेतल्यानंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार संकटात आले आहे. त्यानंतर आता गुजरातमध्येही काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यसभेचं गणित
कॉंग्रेसच्या चारही आमदारांनी शनिवारी राजीनामे दिल्याचे विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वत:च सांगितले. राजीनामे देणाऱ्या त्या चारही आमदारांची घोषणा सोमवारी करू, असे त्रिवेदी यांनी म्हटले आहे. येत्या २६ मार्चला राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या निवडणूकीपूर्वी संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता कॉंग्रेसने आपले १४ आमदार गुजरातहून जयपूरला हलविले आहेत. भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीत अभय भारद्वाज, रमिला बारा आणि नरहरी अमिन यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल आणि भारतसिंह सोळंकी हे निवडणूक लढवत आहेत. अशा रितीने भाजपकडून तीन आणि कॉंग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपला किती मतं लागणार?
गुजरातच्या विधानसभा संख्याबळाच्या आधारावर भाजपला दोन जागा मिळू शकतात. तिसरी जागा जिंकण्यासाठी कॉंग्रेस आमदारांची क्रॉस व्होटिंगची गरज भासणार आहे. कारण तिन्ही जागा जिंकण्यासाठी एकूण १११ मतांची गरज आहे. १८२ जागांच्या गुजरातमध्ये कॉंग्रेसची संख्या ७३ आहे. मात्र, चौघांनी राजीनामे दिल्याने ही संख्या ६९ झाली आहे. भाजपकडे १०३ जागा आहेत. तसेच भारत ट्रायबल पार्टीकडे दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे एक जागा आहे. एक अपक्ष आमदार आहे. भाजपला दोन जागा जिंकण्यासाठी ७४ मतांची गरज आहे. अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी कॉंग्रेसला मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.