अहमदाबाद : दलितांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राजकोटमधील प्रसिद्ध लेखक सुनील जाधव यांनी राज्य सरकारकडून मिळालेला पुरस्कार परत केला आहे.
जाधव हे गेल्या 15 वर्षांपासून स्थानिक माध्यमांसाठी स्तंभलेखनाचे काम करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने त्यांना 2011 मध्ये महात्मा जोतिबा फुले उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले होते. मात्र, सध्या देशभर वाढत असलेल्या दलित अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ जाधव यांनी हा पुरस्कार परत केला आहे.
पुरस्कार स्वरूपात मिळालेले रोख 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह त्यांनी आज राजकोटचे जिल्हाधिकारी विक्रांत पांडे यांच्याकडे जमा केले. या वेळी अमृत मखवाना यांच्यासह अन्य दलित लेखक उपस्थित होते. उणा येथील घटनेनंतर लेखक अमृत मखवाना यांनी आपल्याला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार परत केला होता.
|