नवी दिल्ली - वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम आज तिसऱया दिवशी पूर्ण झाल्यावर हिंदू पक्षाच्या वकिलांनी, मशिदीच्या आवारात बांधलेल्या विहिरीत शिवलिंग सापडले असा दावा केला त्यावरून राजकारण तापले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी याबाबत जाहीर आनंद व्यक्त केल्यावर एमआयएमचे प्रमुख, बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी, ज्ञानवापी ही मशीद होती व प्रलय येईपर्र्यंत ती मशीदच राहील असे प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान ज्ञानवापी परिसरातील शेवटच्या दिवशीचे सर्वेक्षण संपल्यानंतर त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यापूर्वीच येथे शिवलिंग आढळल्याचे जाहीर करण्यात आले यावर मुस्लिम पक्षांने आक्षेप घेतला आहे.
दरम्यान विश्व हिंदू परिषदेनेही येथे शिवलिग सापडल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की ज्ञानवापी च्या सर्वेक्षणात शिवलिंग आढळले ही आनंदाची वार्ता आहे. दोन्ही पक्षांचे वकील व अन्य लोकांच्या उपस्थितीत हे शिवलिंग तेथे मिळाले आहे. ते मंदिर आहे व १९४७ मध्येही (स्वातंत्र्य मिळाले तेव्हा) ते मंदीरच होते हे सिध्द झाले आहे. देशवासीय ही वस्तुस्थिती स्वीकारतील अशी आशा मी करतो.
हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी सांगितले की येथील विहिरीत शिवलिंग सापडले आहे. हिंदू पक्षाचे दुसरे वकील मदनमोहन यादव यांनी, विहीरीतील पाणी कमी होताच आत एक मोठे शिवलिंग दिसू लागले. नंदीच्या मूर्तीच्या अगदी समोर सापडलेल्या या शिवलिंगाचा व्यास १२ फूट ८ इंच असन त्याची खोलीही पुरेशी आहे. दुसरीकडे हिंदू पक्षाचे सोहनलाल आर्य यांनी सांगितले की ‘बाबा‘ आज सापडले आहेत, कल्पनेपेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. हिंदू पक्षाचा दावा मुस्लिम पक्षाने फेटाळला आहे. मात्र वाराणसीचे प्रशासन न्यायालयाचा हवाला देऊन यावर काहीएक बोलण्यास तयार नाही.
आज शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर मोर्य यांनी सांगितले की, तुम्ही सत्य कितीही लपवले तरी एक दिवस ते समोर येतेच. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञानवापीमध्ये बाबा महादेवांनी स्वतः प्रकट होऊन देशाच्या सनातन हिंदू परंपरेला पौराणिक संदेश दिला आहे. तुम्ही सत्य कितीही लपवले तरी एक दिवस ते सर्वांसमोर येतेच. कारण ‘सत्य हेच शिव आहे’. ओवैसी यांनी हिंदू पक्षांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, ज्ञानवापी एक मशीद होती आणि इन्शाअल्लाह कयामत (प्रलय) येईपर्यंत ती मशीदच राहील. फक्त धार्मिक वाद वाढविण्याचा उद्देश या सर्वेक्षणामागे असल्याचा आरोप त्यांनी केला. १९९१ च्या कायद्यानुसार देशातील सारी धार्मिक ठिकाणे आहे त्याच परिस्थितीत रहातील व त्यांचे स्वरूप बदलता येणार नाही. मुळआत हे सर्वेक्षणच चुकीचे आहे. न्यायालयाने अशा सर्वेक्षणासाठी परवानगी दिलीच कशी ? असाही सवाल ओवैसी यांनी विचारला.
ज्ञानवापीतील वस्तुस्थिती व नागरिकत्व कायदा (सीएए) या दोन्ही वेळी ओवैसी यांच्यासारख्यांच्या भूमिका किती टोकाच्या परस्पर विरोधी असतात हे सारा देश पहातो आहे असे भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सागितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.