इंफाळ : गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारामुळे तणावाचा सामना करणाऱ्या मणिपूरला येत्या २९ मे रोजी गृहमंत्री अमित शहा भेट देणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. मणिपूरमधील आरक्षणाच्या मागणीवरून निर्माण झालेल्या वादावर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला जाणार असल्याचे राय यांनी काल सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
राय म्हणाले, की गृहमंत्री अमित शहा मणिपूरमध्ये तीन दिवस मुक्काम करणार आहेत. यादरम्यान ते राज्यातील आरक्षणाच्या मागणीवरून निर्माण झालेला ताणतणाव कमी करून जनतेला न्याय देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. शहा हे राज्यातील विविध भागात जाणार असून ते स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.
सर्व समस्यांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढला जाणार आहे आणि जनतेने सरकारवर देखील विश्वास ठेवायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी हिंसाचारापासून दूर राहावे, असे आवाहन राय यांनी केले. दरम्यान, काल आसामच्या दौऱ्यात गृहमंत्री शहा यांनी मणिपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आणि लवकरच मणिपूरला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते.
गेल्या सहा वर्षांत आणि आताचा हिंसाचार उसळण्यापूर्वी मणिपूरमध्ये कोणत्याही प्रकारची नाकेबंदी झाली नव्हती आणि बंदही पुकारण्यात आला नव्हता. त्यामुळे जनतेने राज्यातील वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा त्यंनी व्यक्त केली. मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, या मागणीच्या विरोधात ३ मे रोजी पर्वतीय जिल्ह्यात ‘आदिवासी ऐक्य मार्च’चे आयोजन करण्यात आले आणि त्यानंतरच हिंसाचाराला उसळला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.