नवी दिल्ली - पश्चिम आशियामधील महत्त्वपूर्ण देश असलेल्या कतारवर सौदी अरेबियासहित इतर अनेक देशांनी निर्बंध लादल्यामुळे येथे असलेल्या भारतीय नागरिकांसाठी अडचणीची परिस्थिती उद्भविली आहे. कतारमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी सरकारतर्फे 25 जून ते 8 जुलै पर्यंत दोहा ते केरळ अशी विशेष हवाई प्रवास सुविधा पुरविण्यात येणार आहे. यासाठी 186 प्रवासी बसण्याची क्षमता असलेले बोईंग 737 वापरण्यात येणार आहे. याशिवाय जेट एअरवेज कंपनीतर्फे गुरुवारी व शुक्रवारी दोहा ते मुंबई या प्रवासासाठी जास्तीची विमानेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ए जी राजु यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. कतारमधून भारतात येण्याची इच्छा असलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी या हवाई मार्गावरील विमानांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी सर्व उपाययोजना तत्काळ करण्यात येईल, असे राजु यांनी स्वराज यांना आश्वस्त केले आहे.
कतारवर निर्बंध लादण्यात आल्यामुळे येथे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवू लागला आहे. कतारमध्ये असलेल्या भारतीयांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. कतारमध्ये सध्या सुमारे 7 लाख भारतीय आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
|