नवी दिल्ली - सीमेवरील सैन्य माघारीच्या निर्णयानंतर भारत आणि चीनमधील तणाव निवळण्याची शक्यता दृष्टिपथात आली असून यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांची दूरध्वनीद्वारे चर्चा झाली. सैन्यमाघारीचा आढावा आणि मॉस्को कराराच्या अंमलबजावणीबाबत दोन्ही नेत्यांची बोलणी झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चिनी परराष्ट्र मंत्र्यांशी झालेल्या वार्तालापाची माहिती ट्विटद्वारे दिली. याआधीही गलवान खोऱ्यातील हिंसक घटनाक्रमानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दूरध्वनीद्वारे चर्चा झाली होती. त्यानंतर रशियामध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीदरम्यानही एस. जयशंकर आणि वांग यी यांची सीमावादावर बोलणी झाली होती. यासाऱ्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीच्या सहमतीनंतर पुन्हा एकदा जयशंकर आणि वांग यी यांची बोलणी झाली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सीमावादावर दोन्ही देश उभयमान्य तोडग्यासाठी सहमत झाल्याचे स्पष्ट केले. श्रीवास्तव यांनी सांगितले, की शनिवारी (ता. २०) दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची दहाव्या फेरीची चर्चा झाली. पॅंगॉंग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण काठावरील संघर्षबिंदूंवरील माघार पूर्ण झाल्यानंतरच्या ४८ तासात ठरल्याप्रमाणे चर्चा झाली. यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी संयुक्त निवेदनही जारी केले. दोन्ही अधिकाऱ्यांची यावेळी ताबारेषेवर पश्चिम विभागातील अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बोलणी झाली. ही माघार उर्वरित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठीचे आणि सर्व संघर्ष बिंदूंवरील सैन्य माघारीसाठी महत्त्वाचे पहिले पाऊल असल्याचे दोन्ही बाजूंनी म्हटले आहे.
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.