नवी दिल्ली : देशवासीयांच्या कल्याणासाठी आपण जास्तीत जास्त चांगले आर्थिक कार्यक्रम राबवू या. त्यासाठी तुर्कस्तान पुढाकार घेणार असेल, तर मी खुल्या दिलाने त्याचे स्वागत करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 1) येथे स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी व्यापारविषयक परिषदेत बोलत होते. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रिसेप तय्यीप एर्दोगन सध्या भारतभेटीवर आले आहेत. काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात बहुपक्षीय चर्चा आवश्यक असल्याच्या त्यांच्या वादग्रस्त सूचनेवर सूचक भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी वरील भाष्य केले. दोन्ही देशांच्या आर्थिक सुधारणांसाठी आपण एकत्र काम करूया, असे आवाहनही मोदी यांनी केले. भारत हे गुंतवणुकीसाठीचे सर्वांत आश्वासक ठिकाण आहे. तसे ते यापूर्वी कधीही नव्हते, असेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असताना भारत आणि तुर्कस्तान या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मात्र स्थिर राहिल्या. आपल्या अर्थव्यवस्था मूलभूत पायावर उभ्या आहेत. त्यामुळेच आपण आशावादी आहोत. पंतप्रधानांनी देशातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले, ""राजकीय व प्रशासकीय स्थैर्य आणि कायदे हे भारतीय राज्यव्यवस्थेचा हॉलमार्क आहे. कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या आर्थिक कार्यक्रमांसाठी अशी व्यवस्था आवश्यक असते.''
मोदींची चपराक
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अन्य कुठल्याही देशाने मध्यस्थी करण्यास भारताचा विरोध आहे. बहुपक्षीय चर्चेलाही भारताचा विरोध आहे; परंतु तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी मात्र बहुपक्षीय चर्चेची सूचना केल्याने मोदींनी दोन्ही देशांनी आर्थिक कार्यक्रमांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करून एर्दोगन यांना चपराक लगावली आहे; अणू पुरवठादार देशांच्या गटात भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश व्हावा, या आपल्या जुन्या भूमिकेचाही एर्दोगन यांनी पुनरुच्चार केला होता.
|