नवी दिल्ली - भारताचे सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे इतर चार न्यायमूर्ती यांच्यामधील वाद आता मिटला असल्याचे बार कौन्सिलकडून आज (सोमवार) सांगण्यात आले.
"या वादास आता पूर्णविराम मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजही सुरळितपणे सुरु आहे. सरन्यायाधीश व सर्वोच्च इतर न्यायमूर्ती यांच्यामधील वाद हा घरगुती स्वरुपाचा होता. या संदर्भात बार कौन्सिलची भूमिका अत्यंत मर्यादित होती. मात्र सर्व न्यायाधीशांनी आता कोणतीही समस्या उद्भविणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे,'' असे बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चेलमेश्वर यांच्यासह रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. न्या. चेलमेश्वर म्हणाले, देशात ही असामान्य घटना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता आहे. न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही या संदर्भात सरन्यायाधीशांना एक पत्र पाठवले. पण त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दोन महिन्यांच्या घटनाक्रमानंतर आम्हाला माध्यमांसमोर येणे गरजेचे होते. आता जनतेनेच योग्य काय ते ठरवावे, असे त्यांनी सांगितले होते.
|