इस्लामचा अर्थ शांतता: सुषमा स्वराज

Sushma Swaraj
Sushma Swaraj

नवी दिल्लीः भारतात हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाने राहतात. पण खूप कमी लोक कट्टरवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. दहशतवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. दहशतवादविरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ठ धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाहच्या 99 नावातही हिंसाचार नाही, असे स्पष्ट मत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यवक्त केले.

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (शुक्रवार) 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले. यावेळी भारताकडून दहशतवादाविरोधात उघडलेल्या मोहिमेवर बोलताना सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला. दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही एका धर्माविरोधात नसल्याचेही स्वराज यांनी स्पष्ट केले. इस्लामिक देशांच्या महत्त्वाच्या परिषदेत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून निमंत्रण मिळाल्याने सुषमा स्वराज यांनी आभार मानले. दुसरीकडे या बैठकीत भारताला निमंत्रण मिळाल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानने या संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.

सुषमा स्वराज म्हणाल्या, 'दहशतवादाविरोधात केवळ लष्करी किंवा कूटनीतीने लढले जाऊ शकत नाही. उलट धर्माचा खरा अर्थ समजून घेऊन त्याच्याशी लढा दिला जाऊ शकतो. यासाठी धर्म जाणणाऱ्या विद्वानांनी समोर आले पाहिजे. युवकांचे भविष्य वाचवावे लागेल. हिंसेचा मार्ग सोडला पाहिजे. ऋग्वेदात म्हटले आहे की, देव एक आहे पण लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे वर्णन करतात. हेच जगातील सर्व धर्मांत म्हटले आहे. दहशतवाद आणि कट्टरवाद दोन्ही एकच आहेत. इस्लामचा संदेश शांतता आहे. कुराणमध्ये म्हटले आहे की, धर्माची सक्ती असू नये. भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आम्ही जागतिक विकासासाठी खूप काही करु इच्छितो. या परिषदेतील अनेक देशांबरोबर भारताचे चांगले आणि मजबूत संबंध आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेतील वृद्धीमुळे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. 2019 हे खास वर्ष आहे. यावर्षी भारत महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी करत आहे.'

'दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही धर्माविरोधातील लढाई नाही. अल्लाचा अर्थ शांती असा होतो. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आसरा देणाऱ्या देशांविरोधात कारवाई झाली पाहिजे. दहशतवादी संघटनांना होणारी फंडिंग थांबली पाहिजे. संस्कृतींचे आदान-प्रदान झाले पाहिजे. सध्याच्या घडीला खरेदी क्षमतेच्या दृष्टीने भारत ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पूर्वेला असलेले ब्रुनोई, इंडोनेशिया आणि मलेशिया हे आमच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसीचे महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव आदी देशांशी आमचे चांगले संबंध आहेत,' असेही सुषमा स्वराज म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com