चेन्नई : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे आजारपण आणि त्यांच्या मृत्यूबाबत गेल्या दोन महिन्यांपासून अनेक तर्क वितर्क लढविले जात होते. त्या पार्श्वभूमीवर जयललितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर येत, अवयव निकामी झाल्यामुळेच जयललिता यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
जयललितांच्या रक्तात संसर्ग झाला होता. हा संसर्ग त्यांच्या अवयवांपर्यंत पोचला. त्यामुळे त्यांना श्वास घेणे कठीण झाले. एकेक अवयव निकामी होत गेला. त्यातच अनियंत्रित मधुमेहामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे जयललितांवर उपचार करणारे डॉक्टर रिचर्ड बेले यांनी सांगितले.
जयललिता यांना तीव्र स्वरूपाचा मधुमेह होता. त्यामुळे त्यांच्या काही अवयवांनी काम करणे बंद केले होते. अतिसार आणि तापामुळे जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्या शुद्धीवर होत्या. मात्र, बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. जीवरक्षक प्रणाली सारखी बंद-सुरू केली जात होती; पण उपचारानंतर त्यांच्या तब्येतीत फरक पडून त्या बोलू लागल्या होत्या,'' अशी माहिती बेले यांनी दिली.
जयललितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकातील अन्य एक डॉक्टर असलेले डॉ. बाबू म्हणाले, जयललिता यांच्या प्रकृतीबाबत शशिकला आणि सरकारी अधिकाऱ्यांना रोज माहिती देण्यात येत होती. जयललितांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियामध्ये अनेक अफवा पसरल्या होत्या. काही जण त्यांच्या मृत्यूमागे कटकारस्थान असल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र, डॉक्टरांनी जयललिता यांच्या मृत्यूमागे कोणतेही कारस्थान किंवा गूढ नसल्याचे स्पष्ट केले आहे.
|