नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी आज न्यायालयात सादर केलेला माफीनामा स्वीकारण्यात आल्यानंतर हा खटला बंद करण्यात येत असल्याचे खंडपीठाने जाहीर केले.
सौम्या बलात्कारप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर काटजू यांनी फेसबुकवरील ब्लॉगद्वारे टीका केली होती. त्यामुळे काटजू यांच्या विरोधात न्यायालयाची अवमान केल्याप्रकरणी खटला सुरू होता. न्यायाधीश रंजन गोगई आणि यू. यू. ललीत यांच्या खंडपीठासमोर काटजू यांचे वकील राजीव धवन यांनी बिनाशर्त माफीनामा सादर केला. काटजू यांनी सादर केलेला माफीनामा स्वीकारण्यात येत असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच हा खटला बंद करण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले. या खटल्याच्या सुनावणीवेळी अनुपस्थित राहण्यासाठी काटजू यांना न्यायालयाने यापूर्वीच परवानगी दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल होण्याची ही पहिलीच वेळ होती. सौम्या बलात्कारप्रकरणी काटजू यांनी म्हटले होते, की न्यायालयाच्या निकालामुळे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकली नाही. त्यानंतर काटजू यांच्या टीकेमुळे संतप्त झालेल्या खंडपीठाने समन्स पाठवत काटजू यांच्या विरोधात न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी खटला सुरू केला होता.
|