कर्नाटक भाजपचे आमदार हरियानात;'ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढल्या 

कर्नाटक भाजपचे आमदार हरियानात;'ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढल्या 

बंगळूर - संक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेले चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले भाजप नेते दिल्लीतूनच ‘ऑपरेशन कमळ’च्या हालचाली करीत असून, आपल्या पक्षाचे आमदार काँग्रेस व ‘धजद’च्या गळाला लागू नयेत यासाठी त्या सर्वांना दिल्लीतून हरियानातील एका रिसॉर्टमध्ये नेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काँग्रेसचे असंतुष्ट आमदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समजते.

गेले काही दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या भाजप नेत्यांनी असंतुष्ट आमदारांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणल्यानंतर ‘ऑपरेशन कमळ’ला गती आली होती. संक्रांतीनंतर कर्नाटकात राजकीय परिवर्तन घडविण्याचा संकल्प केलेल्या भाजप नेत्यांशी काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे असंतुष्ट आमदार आर. नागेंद्र, उमेश जाधव, डॉ. सुधाकर, प्रताप गौड, आनंद सिंग, भीमा नायक, बी. सी. पाटील यांच्यासह काही आमदार बेपत्ता असल्याचे समजते. ते नेत्यांच्या संपर्कापासून दूर असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांचा भाजप नेत्यांशी संपर्क असल्याचे समजते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी या वेळी कोणत्याही परिस्थितीत ‘ऑपरेशन कमळ’ यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी भाजपचे १०४ आमदार युती पक्षाच्या संपर्कात येणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्‍यक असलेला मॅजिक नंबर मिळवूनच बंगळूरला परतण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला अजून दोन ते तीन आमदारांची गरज असल्याचे समजते. त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे; तर असंतुष्ट आमदारांपैकी काहीजण मुंबईत असल्याचे समजते. १९ जानेवारीला असंतुष्ट काँग्रेस आमदार स्फोटक माहिती जाहीर करणार असल्याचे समजते. असंतुष्ट आमदारांचे नेते रमेश जारकीहोळी सातत्याने भाजप नेत्यांच्या संपर्कात असून, त्यांनी त्यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्याचेही वृत्त आहे.

भाजपच्या संपर्कातील आमदार
८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास अनुकूलता दर्शविली. बाकीच्यांनी कार्यकर्त्यांची मते अजमावून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. भाजपला आमदारांची संख्य मिळत नसल्याने ऑपरेशन कमळ लांबणीवर पडत असल्याचे समजते.

काँग्रेस घेणार कायदेशीर मार्गाचा आधार?
काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या गोटात गेल्याचे वृत्त सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावले. काँग्रेसच्या आमदारांसाठी येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या उपाहार कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, काँग्रेस हायकमांडने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला असून, असंतुष्ट आमदारांचे मनपरिवर्तन करण्यात अपयश आल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मुंबईतील हॉटेलमध्ये असलेले रमेश जारकीहोळी, उमेश जाधव, नागेंद्र यांची भेट घेऊन परत बंगळूरला घेऊन जाण्याची सूचना काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांना हायकमांडने केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com