श्रीनगर - जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुरवात आज विरोधकांच्या प्रचंड गोंधळाने झाली. आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालताना राष्ट्रगीताचेही भान राखले नाही.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी नारेबाजीला सुरवात केली. सत्तारूढ पीडीपी-भाजप सरकारच्या विरुद्ध घोषणा देण्यास विरोधकांनी सुरवात केली. विशेष म्हणजे राष्ट्रगीत सुरू असतानाही विरोधकांचा गोंधळ थांबला नाही. भाजपने विरोधकांवर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रगीत सुरू असतानाही विरोधी पक्षांनी विरोध सुरूच ठेवल्याचे भाजपचे म्हणणे आहे. भाजपचे आमदार रवींद्र रैना यांनी विरोधकांप्रमाणेच राज्यपालांवरदेखील राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, नॅशनल कान्फरन्स व कॉंग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रगीतावेळी गोंधळ घातला, तर राष्ट्रगीत सुरू असताना राज्यपालही सदन सोडून बाहेर गेले. राष्ट्रगीताचा हा मोठा अपमान आहे. विरोधी आमदारांप्रमाणेच राज्यपालांनीही माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यपालांच्या अभिभाषणावेळीच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. गोंधळ वाढल्याने राज्यपालांना आपले भाषण मधेच सोडून बाहेर जावे लागले.
|