'मनमोहनसिंग यांनी लोकांमध्ये फूट पाडली नाही'

Kuldip Nayar
Kuldip Nayar

नवी दिल्ली : "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अनेकांनी टीका केली असेल; परंतु त्यांचे टीकाकार नक्कीच मान्य करतील की डॉ. सिंग यांनी लोकांमध्ये कधी फूट पाडली नाही, जे आज होत आहे,'' अशा परखड शब्दांत ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी सिंग यांच्या कार्याचा गौरव करताना विद्यमान सत्ताधाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या.

डॉ. सिंग यांना आज "वनराई फाउंडेशन'तर्फे डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. "तरुण तुर्क' म्हणून राजकीय पटलावर ओळख निर्माण केलेले विचारवंत नेते मोहन धारिया यांच्या पुण्यतिथीनिमित्त "वनराई संस्थे'तर्फे हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार मनमोहनसिंग यांना देण्यात आला. येथे आज झालेल्या सोहळ्यात नय्यर यांच्या हस्ते डॉ. सिंग यांचा सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ""देशाने पंतप्रधानपद देऊन माझा गौरव केला असल्याने मी कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही, पण धारियांच्या नावाने पुरस्कार असल्याने नम्रपणे स्वीकारतो,'' अशी कृतज्ञता मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली; तसेच पुरस्काराची रक्कमही "वनराई' संस्थेला अर्पण केली.

"इतिहास आपल्या कार्याचे मूल्यमापन करेल' या डॉ. सिंग यांच्या विधानाची आठवण करून देत नय्यर म्हणाले, ""राजकारणाला डॉ. मनमोहनसिंग यांनी नैतिक अधिष्ठान दिले, कितीही टीका झाली तरी डॉ. सिंग यांनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही.''
या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, "वनराई'चे विश्‍वस्त गिरीश गांधी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com