कुमारस्वामी सरकार स्थिर?

Karnataka-Assembly
Karnataka-Assembly

बंगळूर : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली असताना सत्ताधारी कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीने (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करायला सुरवात केली आहे. कॉंग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांना आज मंत्री नागराज यांची समजूत काढण्यात यश आले, तर आणखी पाच बंडखोरांनी विधानसभा अध्यक्षांच्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. 

कर्नाटकमधील आमदार आनंदसिंह, डॉ. के सुधाकर, एन नागराज, मुनीरत्न आणि रोशन बेग यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये संयुक्त याचिका सादर केल्या, आम्ही वेगवेगळ्या दिवशी राजीनामे सादर केले असताना देखील विधानसभा अध्यक्ष ते स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या विश्‍वासदर्शक ठरावाच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांकडून बंडखोर आमदारांची मनधरणी केली जात आहे.

काँग्रेस नेते डी. के शिवकुमार यांनी आज पहाटेच गृहनिर्माणमंत्री एम.टी.बी. नागराज यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांच्याशी तब्बल साडेचार तास चर्चा केली. नागराज यांनी त्यांचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर यांनीही त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. या पार्श्‍वभूमीवर नागराज यांनी आपण राजीनामा माघारी घेण्याचा विचार करू शकतो असे म्हटले आहे. रामलिंग रेड्डी, मुनीरत्न आणि आर. रोशन बेग या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.

सिद्धरामय्या आणि दिनेश गुंडूराव यांनीच मला राजीनामा माघारी घेण्याची विनंती केली, मी पक्षामध्येच राहावे असे या नेत्यांचे मत असून, मी त्यांच्या प्रस्तावावर विचार करेन, असे नागराज यांनी स्पष्ट केले. चिकबळ्ळापूरचे आमदार सुधाकर यांना देखील आपण राजीनामा मागे घेण्याची विनंती करू. आपण पक्षावर नाराज होतो, ही परिस्थिती सर्वच पक्षांमध्ये असते, असेही त्यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्र्यांकडून देखील चर्चा 
मुख्यमंत्री कुमारस्वामी हे स्वत: कॉंग्रेसच्या चार बंडखोरांच्या संपर्कात असून, हे आमदार राजीनामा मागे घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. विश्‍वासदर्शक ठरावाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आणि भाजपने त्यांच्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलविले आहे. सत्ताधारी आघाडीने कितीही प्रयत्न केले, तरीसुद्धा सरकारचे पतन अटळ असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी केले आहे. 

विश्‍वासदर्शक ठरावावर सोमवारी मतदान घ्यावे, अशी भाजपची मागणी असून, आता कुमारस्वामी यांनी राजीनामा देणेच योग्य ठरेल. राज्यातील सरकार पडणार हे निश्‍चित आहे. सर्वोच्च न्यायालय बंडखोरांच्या याचिकेवर निर्णय घेण्याआधीच या ठरावावर मतदान होणे गरजेचे आहे. 
- येडियुराप्पा, माजी मुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com