गांधींजींचे स्वप्न साकार करूया; स्वच्छ भारतसाठी मोदींचे आवाहन

गांधींजींचे स्वप्न साकार करूया; स्वच्छ भारतसाठी मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वच्छता ही सेवा मोहिमेची सुरवात केली आणि हातात झाडू घेत येथील बी. आर. आंबेडकर शाळेत सफाईचे काम केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

सरकारमधील मंत्री तसेच भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही देशभरात अशाच प्रकारच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यांनी आज देशभरातील जनतेशी सुमारे दोन तास व्हिडिओ संवाद साधला. यामध्ये विश्‍वासू नेत्यांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांच्यासारख्या मान्यवर मंडळींचाही समावेश होता. मोदींनी आसाम, केरळ, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि हरियानासारख्या राज्यांतील लोकांशी संवाद साधला. याशिवाय त्यांनी इंडो-तिबेटियन सीमा पोलिस कर्मचारी; तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व सद्‌गुरू जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर आणि माता अमृतानंदमयी यांच्याशीही ते बोलले.

मोदी म्हणाले, की स्वच्छ भारत प्रकल्प सुरू केल्यानंतर गेल्या चार वर्षांत तब्बल 9 कोटी शौचालये बांधली गेली असून, साडेचार लाख गावे हागणदारीमुक्त घोषित झाली आहेत. लोकांच्या सहभागाला आणखी चालना मिळावी, यासाठी मोदी यांनी "स्वच्छता ही सेवा' या मोहिमेला सुरवात केली. ही मोहीम पुढील महिन्यातील महात्मा गांधी जयंतीपर्यंत सुरू राहील. समाजातील सर्व घटकांनी तसेच देशाच्या प्रत्येक भागाने या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे आणि गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे तसेच गरीब राज्यांपैकी एक असलेले उत्तर प्रदेश 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी हागणदारीमुक्त झालेले असेल आणि ऑक्‍टोबर 2019पर्यंत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे यावर सरकार काम करत आहे. - योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री.

स्वच्छ भारत मोहिमेचा प्रसार करणे एवढेच पुरेसे नसल्याचे जाणवल्यानंतर वैयक्तिक पातळीवरही मी प्रयत्न केले आणि सर्वांच्या सहकार्याने वर्सोवा बीचची सफाई केली. -अमिताभ बच्चन, बॉलिवूड अभिनेते 

आम्ही यापुढेही स्वच्छ भारत मोहिमेशी जोडलेले असू आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करू. 
- रतन टाटा, उद्योगपती 

स्वच्छतेची व्याप्ती कधी काळी 40 टक्के होती, ती आता 90 टक्‍क्‍यांवर गेली आहे. स्वच्छतेमध्ये मागील 60 ते 70 वर्षांत झाली नाही एवढी प्रगती आपण चार वर्षांत केली. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com