कारसेवकांवरील गोळीबार योग्यच: मुलायमसिंह यादव

कारसेवकांवरील गोळीबार योग्यच: मुलायमसिंह यादव

लखनौ : अयोध्येत कारसेवकांवर 1990 मध्ये गोळीबार करण्याचे आदेश देण्याची आपली कृती योग्यच होती. देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आणखी लोक मारावे लागले असते, तर सुरक्षा दलांनी आणखी काहीजणांचा खात्मा केला असता, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी आज केले. मुलायम यांचा 79 वा वाढदिवस पक्षाच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षामध्ये "ऑल-इज-वेल' असल्याचा संदेश दिला.

पोलिसांनी 30 ऑक्‍टोबर 1990 रोजी अयोध्येत केलेल्या गोळीबारात 28 लोक ठार झाले होते. विश्‍व हिंदू परिषदेच्या आवाहनानंतर देशभरातून लाखो कारसेवक राममंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमी अयोध्येत एकत्र आले होते. बाबरी मशीद पाडून मंदिर उभारणे हेच त्यांचे लक्ष्य होते. आमचे पूजनीय स्थानच नष्ट होणार असेल तर देशामध्ये काय शिल्लक राहील, असा सवाल करत मुस्लिमांनीही शस्त्रे हातात घेतली होती, त्यामुळे बाबरी मशिदीच्या संरक्षणासाठी कारवाई करणे योग्यच होते, असे मुलायम यांनी नमूद केले.

वाजपेयींशी चर्चा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील गोळीबारामध्ये 56 लोक मारले गेले होते. यावरून माझा त्यांच्याशी वादही झाला होता. सहा महिन्यांनंतर या गोळीबारात नेमके किती लोक मरण पावले हे मला समजले. मृतांच्या नातेवाइकांनाही मी माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली असे सांगत मुलायमसिंह यांनी आजही मुस्लिम समाज आमच्याच पक्षाचे समर्थन करतो असे सांगितले. याखेपेस त्यांची मते आम्हाला मिळाली नाहीत हा दोष त्यांचा नसून, आमच्या नेत्यांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अखिलेशला आशीर्वाद
मुलायम यांच्या वाढदिनाच्या कार्यक्रमास त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव देखील उपस्थित होते. अखिलेशला माझे आशीर्वाद असून ते भविष्यातही राहतील. अखिलेश माझ्यासाठी सर्वप्रथम मुलगा असून नंतर तो नेता आहे, असे ते या वेळी म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमास अखिलेश यांचे काका आणि मुलायम यांचे समर्थक असणारे शिवपाल यादव मात्र अनुपस्थित राहिले. या वेळी मुलायम यांनी कार्यकर्त्यांना चार खडे बोलही सुनावले. मागील निवडणुकीतील पराभवास कार्यकर्तेच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com