Parliament-Session
Parliament-Session

अधिवेशनात महाराष्ट्राचा आवाज ‘बुलंद’च; प्रश्‍न मांडण्यात सुप्रिया सुळे, सहस्रबुद्धे आघाडीवर

नवी दिल्ली - कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बसण्याची व सर्वच व्यवस्था नवीन असूनही राज्यातील बहुतांश खासदारांनी आपापले मतदारसंघ व देशापुढील प्रश्‍नांबाबत संसदेत आवाज उठवला आहे. दोन्ही सभागृहांतील ६९ पैकी ९ खासदार मात्र संपूर्ण अधिवेशनात मौनी राहिले. भाजपचे उन्मेष पाटील हे सर्वाधिक ४१ वेळा संसदेत बोलणारे खासदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सर्वाधिक ४७ तर राज्यसभेत भाजपचे विनय सहस्रबुद्धे बुद्धे यांनी ३९ लेखी प्रश्‍न सरकारला विचारले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संसदीय अभ्यास व संशोधन संस्थेकडून (पीआरएस) ‘सकाळ’ ला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांनी पहिल्याच अधिवेशनात आपला ठसा उमटवताना राज्यसभेत सर्वाधिक २४ वेळा भाषण केले आणि २८ प्रश्‍न विचारले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबरोबरच हेमंत गोडसे, राजेंद्र गावीत व सदाशिव लोखंडे आदींनी (उपस्थित असल्यास) एकदाही, एकही मुद्दा किंवा लेखी प्रश्‍नही उपस्थित केला नाही. भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे विनायक राऊत या एरवी प्रभावी बोलणाऱ्या खासदारांनीही या वेळी चर्चेत शांत राहणेच पसंत केल्याचे दिसते.

कोरोनामुळे अधिवेशन अभूतपूर्व परिस्थितीत झाले. प्रश्‍नोत्तराचा तास कोरोनामुळे रद्द केला गेला. मात्र राज्यातील अनेकांनी शून्य प्रहर किंवा विधेयकांवरील चर्चा-लेखी प्रश्‍न विचारण्यात सक्रियता दाखविल्याचे दिसते.

शून्य प्रहर व विविध विधेयकांवरील चर्चेत हे खासदार सहभागी झाले. कॉंग्रेसचे राजीव सातव यांनी राज्यसभेतील पहिल्याच अधिवेशनात ३३ प्रश्‍न विचारले. मात्र गोंधळातील निलंबित ८ खासदारांत त्यांचाही समावेश होता. 

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, उदयनराजे भोसले हे खासदार या अधिवेशनात दिसलेच नाहीत. यातील काहींनी पीठासीन अधिकाऱ्यांना त्याबाबत कळविले होते. प्रतापराव चिखलीकर व प्रतापराव जाधव हे कोरोनामुळे हजर राहू शकले नाहीत तरी जाधव यांनी १५ लेखी प्रश्‍न विचारले आहेत. याआधी मौनी खासदारांत गणना होणारे कॉंग्रेसचे कुमार केतकर यांनी यावेळी ४ प्रश्‍न विचारले. शून्य प्रहरातील त्यांच्या गुजरातच्या मच्छिमारांच्या एकमेव मुद्याची दखल घेऊन सभापती वेंकय्या नायडू यांनी निर्देश दिले.

राज्यातील मौनी खासदार
(यातील काही जण अनुपस्थित असण्याची शक्‍यता) 
नारायण राणे, पूनम महाजन, विनायक राऊत, उदयनराजे भोसले, हेमंत गोडसे, बाळू धानोरकर, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक. 

शून्य प्रहर
चर्चेत सर्वाधिक मुद्दे मांडणारे 
उन्मेष पाटील (४१),सुजय विखे पाटील (२८),फौजिया खान (२४), राजीव सातव (१८),रक्षा खडसे (१७), श्रीरंग बारणे ९१६), सुप्रिया सुळे (१३), प्रियांका चतुर्वेदी (११). 

सर्वाधिक लेखी प्रश्‍न विचारणारे 
सुप्रिया सुळे (४७), उन्मेष पाटील, सुजय विखे, श्रीरंग बारणे (प्रत्येकी ४०), सातव (३३), फौजिया खान (२८), इम्तियाज जलील (२३), प्रियांका चतुर्वेदी (२०).

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com