नवी दिल्ली - दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दोन विमानांमध्ये शुक्रवारी होणारा भीषण अपघात वैमानिकांच्या प्रसंगावधनेतेमुळे टळला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर येण्याच्या काही वेळापूर्वी ही घटना घडली.
एअर इंडियाचे विमान ज्या धावपट्टीवरून उड्डाण करणार होते, त्याच धावपट्टीवर इंडिगो कंपनीचे विमान उतरत होते. धडक टाळण्यासाठी एअर इंडिगोच्या विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले. तसेच दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान दाखविल्याने ही दुर्घटना टळली. एअर एंडियाचे दिल्लीहून गोव्याला जाणारे "एआय 156' हे विमान 28 क्रमांकाच्या धावपट्टीवरून सकाळी सव्वाअकरा वाजता उड्डाणाच्या तयारीत होते.
त्याच वेळी इंडिगोचे विमान धावपट्टीवर उतरत असल्याचे वैमानिकाला दिसले. त्याने विमान वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधून उड्डाण रद्द करीत असल्याचे कळविले. "एटीसी'नेही वैमानिकाला थांबण्याची व विमान पुन्हा तळावर वळविण्याची सूचना केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या विमानात 122 प्रवासी होते. नंतर दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी विमान गोव्याकडे झेपावले.
इंडिगो कंपनीचे विमान रांचीहून दिल्लीला आलेले "6ई398' हे विमान त्यानंतर 27 मिनिटांनी त्याच धावपट्टीवर उतरणार होते. विमानाला उतरण्याची सूचनाही मिळाली होती. पण जेव्हा ते जमिनीवर टेकले तेव्हा धावपट्टीवर वैमानिकाला एअर इंडियाचे विमान दिसले. त्याने "स्टॅंडर्ड ऑपरेटिंग' यंत्रणेचा वापर करीत पुन्हा उड्डाण केले.
|