भोपाळ - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना बॅकबेंचर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ज्योतिरादित्यांची बाजू घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना लवकर समजलं की शिंदेंशिवाय मध्य प्रदेशात काँग्रेस शून्य आहे असा खोचक टोलाही लगावला. नरोत्तम मिश्रा म्हणाले की, काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीवेळी शिंदे यांना नवरदेव म्हणून पुढे केलं पण जेव्हा मुख्यमंत्री बनवण्याची वेळ आली तेव्हा मात्र कमलनाथ यांना पुढे करण्यात आलं.
राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये शिंदे असते तर आतापर्यंत ते मुख्यमंत्री झाले असते. यावर उत्तर देताना मिश्रा म्हणाले की, जे लोक दोन वर्षात काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकले नाहीत ते कोणाला मुख्यमंत्री काय बनवणार? असं असेल तर काँग्रेसनं राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावं असं आव्हानही नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींना दिलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल गांधींच्या टीकेचं उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, एवढी काळजी राहुल गांधी यांना आता आहे. जेव्हा मी काँग्रेसमध्ये होते तेव्हा इतकी काळजी केली असती तर बरं झालं असतं. यापेक्षा जास्त काही मला बोलायचं नाहीय असंही शिंदे म्हणाले.
काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी 11 मार्च 2020 ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मध्य प्रदेशातील 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानं काँग्रेसचं सरकार पडलं होतं. एक वर्षानंतर राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव घेऊन टीका केली. त्यावर शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. दरम्यान, राहुल गांधीं यांच्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर डिअर राहुल गांधी असा ट्रेंडही सुरु झाला असून यामध्ये ट्रोल केलं जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.