राजीव गांधीच दंगलीवर देखरेख करत होते : सुखबीरसिंग बादल 

राजीव गांधीच दंगलीवर देखरेख करत होते : सुखबीरसिंग बादल 

नवी दिल्ली : 'तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झालेल्यानंतर सुरू झालेल्या शीखविरोधी दंगलींमध्ये खुद्द राजीव गांधी घडत असलेल्या हत्याकांडाचे नेतृत्त्व करत होते' असा आरोप पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी आज (सोमवार) केला. कॉंग्रेसचे वादग्रस्त नेते जगदीश टायटलर यांच्या राजीव गांधींसंदर्भातील एका विधानावर प्रतिक्रिया देताना बादल यांनी हा आरोप केला. 

'दिल्लीमध्ये दंगल सुरू असताना राजीव गांधी स्वत: शहराच्या विविध भागांमध्ये फिरले. परिस्थिती नियंत्रणाखाली न आणल्याबद्दल राजीव गांधी कॉंग्रेसच्या खासदारांवर संतापले होते', असे विधान टायटलर यांनी केले होते. या विधानावरून बादल यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. 

बादल म्हणाले, "दंगल सुरू असताना राजीव गांधी टायटलर यांच्यासोबतच शहरात फिरत होते, असे त्यांनीच म्हटले आहे. म्हणजेच, त्यावेळी घडत असलेल्या हत्याकांडावरच ते नजर ठेवत होते. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने यात लक्ष घातले पाहिजे.'' 

विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरवातीला दिल्लीतील शीखविरोधी दंगलींची पुन्हा चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. निवृत्त न्यायाधीश शिवनारायण धिंग्रा यांची या तपास पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त सनदी अधिकारी राजदीपसिंग आणि अविशेक दुल्लर हे या तपास पथकाचे इतर दोन सदस्य आहेत. येत्या दोन महिन्यांत या पथकाने त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करायचा आहे. 

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये झालेल्या दंगलीत एकूण 3,325 जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी एकट्या दिल्लीतच 2,733 जणांचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com