नवी दिल्ली : 'कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांचा पाकिस्तानने अपमान केला आहे. याचा बदला घेण्यासाठी आता थेट युद्धच पुकारायला हवे आणि पाकिस्तानचे चार तुकडे करण्याची गरज आहे' असे विधान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरीचा आरोप ठेवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांची सोमवारी (ता. 25) त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाली. मात्र, या भेटीदरम्यान पाकिस्तानने जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ठरवून छळ केल्याचे तपशील आता समोर येत आहेत. यावरून देशभरात संतापाची लाट आहे.
'या सर्व समस्येवरचा एकमेव तोडगा म्हणजे पाकिस्तानचे तुकडे करणे. या युद्धासाठीचा 'होमवर्क' आता गांभीर्याने सुरू करायला हवा' असे मत स्वामी यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय, कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांचा पाकिस्तानने अपमान केला आहे आणि भारताने या अपमानाचा बदला घ्यायला हवा अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
पाकिस्तानने कुलभूषण यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीची तुलना स्वामी यांनी महाभारतामधील द्रौपदीशी केली आहे. 'या सर्व घटनाक्रमामुळे आम्ही दुखावले गेलो आहोत. आता पाकिस्तानविरुद्ध निर्णायक युद्ध पुकारून त्या देशाचे चार तुकडे करण्याची वेळ आली आहे', असे स्वामी म्हणाले. याशिवाय, मानवतावादी दृष्टिकोनातून पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे व्हिसा थांबविण्याची मागणीही त्यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.