राहुल आजकाल केवळ त्रागाच करतात : प्रसाद 

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : 'संघाला सत्ता आल्यावरच तिरंगा झेंड्याची आठवण आली,' या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेने घायाळ झालेल्या भाजपने, पुन्हा आणीबाणी उकरून काढतानाच, सध्या देशाच्या सत्तर टक्के भूभागावर भाजपची सत्ता आहे. हे न कळणाऱ्या राहुल गांधी यांची आम्हास दया येते, असा प्रतिहल्ला चढविला आहे. राहुल आजकाल भाषण करत नाहीत; केवळ आक्रस्ताळेपणाने त्रागा करतात, असा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.

विरोधकांचा आजचा मेळावा हा (मोदींच्या लोकप्रियतेला घाबरलेल्या) हरलेल्या लोकांचा हा जमाव होता. पराभव हाच त्यांचा सामायिक वारसा (सांझी विरासत) होता असेही टीकास्त्र त्यांनी सोडले. 

संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते शरद यादव यांच्यावर टीका करताना प्रसाद म्हणाले, की जयप्रकाश यांच्या चरणाशी बसून कॉंग्रेस विरोधानेच आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे यादव आज राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे पहाणे क्‍लेशकारक आहे. राहुल यांनी संघावरच नेम धरल्याने प्रसाद यांनी, संघाचे विचार देशवासीयांना मान्य असल्याचा दावा केला.

ते म्हणाले, की राहुल आजकाल भाषण देण्याऐवजी फक्त चिडचिड करतात. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत देशाची मुस्कटदाबी करताना, 'एकनिष्ठ न्यायसंस्था' असे सूत्र मांडले होते. या स्थितीत राहुल यांना संघाबाबत अशी विधाने करणे शोभा देणारे नाही. आजच्या मेळाव्याला डावे पक्षही होते. त्याबाबत प्रसाद म्हणाले, की मध्य प्रदेश व पश्‍चिम बंगालमध्ये नुकत्याच काही पालिकांच्या निवडणुका झाल्या. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस पहिल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या डाव्यांचा काही पत्ताच नाही ते कोठे गेले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com