नवी दिल्ली : 'फक्त एखादी निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांवर आरोप करताना त्यांचे संबंध थेट पाकिस्तानशी असल्याचा आरोप करायचा? इन्क्रेडिबल!' अशा शब्दांत भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर टीका केली.
'पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेसने गुजरातमधील निवडणूक जिंकण्यासाठी कट रचला' असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. यावर काँग्रेस आणि पाकिस्तानने याआधीच टीका केली आहे.
गेल्या काही काळापासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी फटकून वागणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या आरोपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'निवडणूक जिंकण्यासाठी आणि तेदेखील निवडणुकीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना रोज विरोधकांवर नवनवे निराधार आरोप का करायचे', असा प्रश्न सिन्हा यांनी विचारला. 'राजकारण कलुषित करू नका.. सुदृढ प्रचार आणि सुदृढ राजकारण करा' असा सल्लाही सिन्हा यांनी पंतप्रधानांना दिला आहे.
काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी गेल्या वर्षी पाकिस्तान दौऱ्यादरम्यान 'दोन्ही देशांमध्ये शांततेची प्रक्रिया सुरु होण्यासाठी मोदी यांना हटविण्याची गरज आहे' अशा आशयाचे विधान केले होते. याचा आधार घेत पंतप्रधान मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसवर कडाडून टीका केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.